राहाता – महाविकास आघाडी सरकार भ्रष्टाचाराने बरबटलेले सरकार आहे. त्यात आता अहमदनगर जिल्ह्यातील एका मंत्र्याचाही समावेश आहे, असा आरोप भाजपचे आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केला. या दाव्यामुळे जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे.
प्रवरानगर येथील डॉ. विठ्ठलराव विखे-पाटील कारखान्याचा ७२ वा ऊस गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ आमदार राधाकृष्ण विखे-पाटील यांचे हस्ते पार पडला त्यावेळी विखे-पाटलांनी हे वक्तव्य केलं. ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारमधील काही मंत्री, तसेच अधिकाऱ्यांच्या भ्रष्टाचाराची अनेक प्रकरणे समोर येत आहेत. महाराष्ट्राचे गृहमंत्री फरार असल्याची ही पहिलीच घटना आहे. आयकर विभागाच्या धाडीत हजारो कोटींचा भ्रष्टाचार समोर आलाय. अनेक मंत्री यात अडकलेले असुन, कुणाला लक्ष्मी प्रसन्न झाली, कुणाचे हात सोन्याने पिवळे झाले, हे समोर येणारच आहे. त्यामुळे हे रॅकेट आता उध्वस्त झालेच पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हाती
भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे महाविकास आघाडी सरकारची एवढी बदनामी झालीय की, या सरकारने सामान्य जनतेचा विश्वास गमावला. भ्रष्टाचाराची मालिका आणि सरकारचं अपयश झाकण्यासाठी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली. महाराष्ट्र बंद करून आपली राजकारणाची पोळी भाजण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा रिमोट दुसऱ्याच्या हाती आहे. राज्य सरकारने कितीही नौटंकी केली तरी जनता त्यांना जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही, अशी घणाघाती टिकादेखील राधाकृष्ण विखे-पाटलांनी यावेळी केली.