कोरोना महामारीच्या काळात अनेक मृतदेह गंगेत तरंगताना दिसले. याबाबत आज, सोमवारी केंद्र सरकार राज्यसभेत म्हणाले की, ‘दुसऱ्या कोरोना लाटेदरम्यान गंगेत तरंगणाऱ्या मृतदेहांच्या संख्येबाबत कोणतीही डेटा नाहीये.’ कनिष्ठ जलशक्ती मंत्री बिश्वेश्वर टुडू म्हणाले की, ‘गंगा नदीत फेकलेल्या कोरोना मृतदेहांच्या संख्येबाबत माहिती उपलब्ध नाहीये.’ तृणमूल काँग्रेसचे खासदार डेरेक ओ ब्रायन यांच्या एका प्रश्नाचे उत्तर देताना मोदी सरकारने हे कबूल केले.
खासदार डेरेक ओ ब्रायन यांनी कोरोना प्रोटोकॉलच्यानुसार मृतदेहाचे विल्हेवाट लावण्याबाबत उचललेल्या पाऊलाबाबत माहिती देण्याची मागणी होती. त्यावेळी उत्तरात मंत्री म्हणाले की, ‘अज्ञात मृतदेह नदीच्या किनारी आढळले होते आणि या घटना उत्तर प्रदेश आणि बिहारच्या जिल्ह्यातून समोर आली होत्या. मंत्रालयाने संबंधित राज्य सरकारला मृतदेह आणि विल्हेवाटसंदर्भात करण्यात आलेल्या कामाबाबत एक अहवाल मागितला होता. तसेच यासंबंधित उत्तराखंड, झारखंड आणि बंगालच्या मुख्य सचिवांना अॅडवाईजरी जारी केली होती.’
सरकारच्या या उत्तरावर काँग्रेसने प्रतिक्रिया देत ज्येष्ठ नेते केसी वेणुगोपाल म्हणाले की, ‘हे उत्तर ऑक्सिजन कमी केल्यामुळे होणाऱ्या मृत्यूबाबत विचारलेल्या प्रश्नांप्रमाणे होते.’
दरम्यान गेल्या वर्षी मे-जून महिन्यात पवित्र गंगेत मृतदेह तरंगतानाचे भयावह फोटो समोर आले होते. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याचे म्हटले होते. हे भयावह फोटो जगभरात व्हायरल झाले होते. सर्वोच्च न्यायालयाने ही गंभीर समस्या असल्याचे म्हटले होते आणि संबंधित सरकारला फटकारले होते.
हेही वाचा – पंतप्रधान मोदी अधिर रंजन चौधरींवर भडकले; म्हणाले, ‘मला तुम्ही असे करण्यास भाग पाडले’