मुंबईः महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर राजकीय संकट गडद होत चालले आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्र विधानसभा विसर्जित करण्याचे संकेत दिले आहेत. राज्यातील राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ट्विट करून ही माहिती दिली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, ‘महाराष्ट्रात सध्या सुरू असलेले राजकीय संकट विधानसभा बरखास्त करण्याकडे वाटचाल करीत आहे’.
शिवसेना नेते एकनाथ शिंदे पक्षाचे 34 आमदार आणि 7 अपक्ष आमदारांसह आसामच्या गुवाहाटी येथे पोहोचले आहेत. सर्व बंडखोर आमदारांची रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली आहे. यादरम्यान हॉटेलबाहेर मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. मात्र, दरम्यान, महाराष्ट्र मंत्रिमंडळाची बैठक दुपारी एक वाजता होणार आहे. तसेच आज महाराष्ट्र काँग्रेसचे निरीक्षक कमलनाथ यांच्या उपस्थितीत काँग्रेस विधिमंडळ पक्षाची बैठक होणार आहे. या बैठकीला 43 आमदार उपस्थित राहणार आहेत.
महाराष्ट्रात सुरू असलेल्या राजकीय संकटाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे मुंबईतील वायबी चव्हाण सेंटर येथे बैठक घेणार आहेत. राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, मंत्री जयंत पाटील आणि बाळासाहेब पाटील यांनी आज सकाळी त्यांची निवासस्थानी भेट घेतली. त्यानंतर आता राष्ट्रवादीची बैठक होणार आहे. त्यामुळे राज्यातील घडामोडी वेगवान झाल्या आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दुपारी मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजीनामा देण्याची दाट शक्यता असून, महाविकास आघाडी सरकार आता कोसळणार हे नक्की झालं आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतेच एक ट्विट करत विधानसभेचा बरखास्तीच्या दिशेने प्रवास असल्याचे म्हटल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे तासाभरात राजीनामा देतील असे समजते.
यापूर्वी युवासेना प्रमुख, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँण्डलवरून मंत्रिपदाचा उल्लेख हटवला आहे. त्यामुळे आता केवळ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या राजीनामाच्या घोषणेची औपचारिकता शिल्लक आहे. महाविकास आघाडी सरकार हे एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यामुळे आणि त्यांच्यासोबत 40 पेक्षा जास्त आमदार असल्याने ठाकरे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काही तासात आजच राजीनामा देतील.
हेही वाचाः विधानसभा बरखास्तीच्या दिशेने.., खासदार संजय राऊतांचे संकेत