ऑगस्ट महिन्याच्या सुरूवातीपासूनच संपूर्ण राज्यभरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. मान्सूनच्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे सरकला असल्याने राज्याभरात पावसाचा जोर वाढला असल्याची माहिती हवामानविभागाने दिली होती. दरम्यान, आता हवामान विभागाकडून पुढील 48 तास राज्यतील पुणे, रायगड, रत्नागिरी, सातारा या चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसेच हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या भागांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
15 Aug, 🇮🇳
48 hrs district level rainfall warning issued by IMD for Maharashtra. pic.twitter.com/xwb5EShhCS— K S Hosalikar (@Hosalikar_KS) August 15, 2022
पुढील 48 तासामध्ये दक्षिण कोकण आणि गोवा किनारपट्टीवर मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली जात आहे. मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील घाट माध्यासह धरण क्षेत्रातही दमदार पाऊस सुरूच आहे. मात्र यामुळे सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील नद्यांची पाणी पातळी देखील वाढली आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरण क्षेत्रात जोरदार पाऊस
राधानगरी आणि कोयना धरण परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे कोयना व राधानगरी धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा व पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे.
नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली
कोल्हापूर, सातारा आणि सांगली परिसरात जोरदार पाऊस कोसळत आहे, त्यामुळे नदीच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली. त्यातच राधानगरी आणि कोयना धरण परिसरातही मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळत असल्याने धरणातून पाणी विसर्गही चालू आहे. त्यामुळे धरणाखाली असणाऱ्या नद्यांना पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. पुराच्या पाण्यामुळ नृसिंहवाडीचे पूर्ण मंदिर पाण्याखाली गेले आहे.