एक डाव मुंबईकरांनी लक्षात ठेवायला हवा, मोदी बोलले ते भयानक आहे. बँकेत पैसा ठेऊन विकास होत नाही, तो पैसा विकासासाठी वापरला पाहिजे, ते तुम्हाला कळत आम्हाला कळत नाही. भक्त अंध असतील समजू शकतो, पण गुरु सुद्धा अंध, म्हणत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुंबई महापालिकेच्या एफडीवरून पंतप्रधान मोदींन केलेल्या टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी मुंबई महानगरापालिकेवरून भाजपने केलेल्या आरोपांवर पलटवार केला आहे. तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्य़ा दावोस दौऱ्यावरही टीकास्त्र डागले आहे.
एफडी म्हणजे नेमकं काय आहे? मुंबई महापालिकेच्या एफडीमध्ये नेमकं काय आहे? साठे सत्तर हजार कोटी कसे जमले, कोणी दिले? साधारण 2002 पर्यंत मुंबईत तुटीचा अर्थसंकल्प होता. साडे सहाशे कोटी खड्ड्यात होते. तेव्हाचे कमिश्नर आणि आपल्या लोकप्रतिनिधी, नगरसेवकांनी मेहनत आणि मांडणी करुन आज या ठेवी झालेल्या आहेत, अस म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या टीकेला चोख उत्तर दिलं आहे.
… म्हणून ते भूमिपूजन करु शकेल
दोन-तीन दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत येऊन गेले. त्यांनी आम्ही करत असलेल्या कामांचंच भूमिपूजन केलं. दुसरं काय केलं? मेट्रो, कोस्टल रोड, एचडीपी असेल, पंतप्रधान उद्या येणार म्हणून रात्री ही कामं सुरू झाली नाहीत. गेले तीन वर्षे आम्ही ही कामं करत होतो त्याची पायाभरणी आम्ही केली म्हणून आणि म्हणून ते भूमिपूजन करु शकेल, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.
मुख्यमंत्री दावोसाला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार
महाराष्ट्रात येणार उद्योग गुजरातला पळवले. आर्थिक केंद्र गुजरातमध्ये नेलं. फिल्मसिटीसुद्धा न्यायला आले होते. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री महाराष्ट्रात येऊन पाच कोटी घेऊन गेले. महाराष्ट्रात येऊन बाजूच्या राज्यातील मुख्यमंत्री गुंतवणूक घेऊन जात आहेत आणि आमचे मुख्यमंत्री दावोसाला जाऊन भाकरवडी उद्योग काढणार… भाकरवडी आमच्या बाजूच्या वाडीत बनतात. तेच मुख्यमंत्र्यांनी दावोसला जाऊन करार केला, पुरणपोळी उद्योग सुरु करणार, असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
कदाचित ते शाकाहारी असतील पण त्यांनी सोन्याची अंडी देणारी कोंबडी कापायची
मुंबई तुम्हाला का पाहिजे. तर मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी म्हणून तुम्ही बघताय आणि आम्ही ती आमची मातृभूमी म्हणून तिला जपतो. कदाचित ते शाकाहारी असतील पण सोन्याची अंडी देणारी ही कोंबडी त्यांना कापायची आहे. आणि मुंबईला भीकेला लावायचे आहे. ही मुंबई मराठी माणसांनी रक्त सांडून मिळवलेली आहे. ती आम्ही तुम्हाला लूटू देणार नाही. तेव्हा मुंबईवर बुरी नजर टाकणाऱ्यांनो, बुरी नजर वाले, तुमचं तोंड आम्ही काळं करणार म्हणजे करणारचं असा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला. ही जे काही त्यांचे गुलाम आहेत ते मुंबईचे सर्व पैसे सुरत आणि दिल्लीला घेऊन जातील, असा आरोपही उद्धव ठाकरेंनी केला आहे.
महाराष्ट्र द्वेष्ट्या माणसाला हाकलून द्यायला हवे
यावेळी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या राजीनाम्यावर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, कोश्यारी पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केली, फार लवकर शहानपण सुचलं. खर म्हणजे महाराष्ट्र द्वेष्ट्या माणसाला हाकलून द्यायला हवे, विधानभवनात गेल्यावर आपल्या महापुरुषांची आणि दैवतांचे फोटो लावलेले आहेत. त्यांचा अपमान करणार हा माणूस. आज बाळासाहेबांचे तैलचित्र लागतेय आणि त्याचनिमित्ताने हे घरी जायची वाट पाहत आहेत. परवानगी मागतायतं. म्हणत त्यांना टोला लगावला आहे.