आज (ता. १९ मार्च) छत्रपती संभाजीनगर येथे सकल हिंदू समाजाकडून नामांतरणाच्या समर्थनात जनगर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. पोलिसांकडून या सभेला परवानगी नाकारणीयता अली होती. पण तरी देखील हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्याला हजारोच्या संख्येने लोक उपस्थित राहिले असून आजचा मोर्चा शांततेच्या मार्गानेच होणार असल्याची माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्याकडून देण्यात आली आहे.
औरंगाबाद जिल्ह्याचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव करण्याला केंद्राने परवानगी दिल्यानंतर राज्यात एकच जल्लोष करण्यात आला. पण औरंगाबादच्या नामांतरणाला एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी विरोध करत साखळी उपोषण केले. यामुळे काही दिवस जिल्ह्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पण आता याच्या समर्थनात छत्रपती संभाजीनगरमध्ये सकल हिंदू समाजाच्यावतीने जनगर्जना मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्यामध्ये भाजप आणि शिवसेनेचे (शिंदे गट) अनेक नेते देखील सहभागी झाले आहेत. गोहत्या, धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या कायदा लागू करण्यात यावा, अशी मागणी सुद्धा या मोर्च्याच्या माध्यमातून करण्यात आली आहे.
सकल हिंदू समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या मोर्च्याला पोलिसांकडून परवानगी नाकारण्यात आली होती. पण तरी सुद्धा हा मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्च्याला मोठ्या संख्येने तरुणाई उपस्थित राहिल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच यावेळी इम्तियाज जलील विरोधात देखील उपस्थित मोर्चेकऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आहे. छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा, श्रीरामांचा पुतळा तसेच भगवे झेंडे हातात घेऊन हा भव्य मोर्चा शहरातून काढण्यात आला आहे.
मंत्री अतुल सावेंचे इम्तियाज जलील यांना आव्हान
आज छत्रपती संभाजीनगर मधून काढण्यात आलेल्या मोर्च्याला अनेक नेत्यांनी देखील हजेरी लावली आहे. राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे हे सुद्धा या मोर्च्यामध्ये उपस्थित राहिले आहेत. यावेळी ते बोलताना म्हणाले की, खासदार इम्तियाज जलील यांनी आधी स्वतःच्या घरातील एखाद्या व्यक्तीचे नाव औरंगजेब ठेवावे आणि मगच जिल्ह्याचे नाव औरंगाबाद करण्याचा प्रयत्न करावा, असे आव्हान मंत्री अतुल सावे यांनी केले आहे.
शहरातील क्रांती चौक येथून या मोर्च्याला सुरुवात झाली असून जिल्हा कोर्ट, विवेकानंद कॉलेज, निराला बाजार येथून हा मोर्चा मार्गस्थ होत औरंगपुरा येथे या मोर्च्याची सांगता होणार आहे. दोन दिवसांपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून देखील नामांतराला पाठिंबा देण्यासाठी असाच एक मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पोलिसांनी काही वेळातच या मोर्च्याला अडवले होते.
दरम्यान, या मोर्च्याबाबत ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्याकडून मत व्यक्त करण्यात आले आहे. आजच्या मोर्च्याची मला काहीच माहिती नाही, अशी माहिती चंद्रकांत खैरे यांनी दिली आहे. तसेच , या मोर्च्याच्या माध्यमातून राजकारण शिजत आहे. एमआयएम ही भाजाची बी टीम आहे, त्यामुळे जलील जे काही करत आहेत, ते भाजपच्या सांगण्यावरून होत आहे. पण या मोर्च्यामध्ये सर्व हिंदू समाज एकत्र आल्याचा आनंद असल्याचे म्हणत खैरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.
हेही वाचा – आधी २४० जागा लढण्याचा दावा; मग शिंदे गट आक्रमक होताच बावनकुळेंची सारवासारव