घरमहाराष्ट्रe vehicle : 'टेस्ला'साठी महाराष्ट्राचे दार खुले; उदय सामंतांनी केले आश्वस्त

e vehicle : ‘टेस्ला’साठी महाराष्ट्राचे दार खुले; उदय सामंतांनी केले आश्वस्त

Subscribe

 

मुंबईः e vehicle निर्मितीतील अग्रगण्य टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात वाहन निर्मितीसाठी जागा दिली जाईल, असे आश्वासन उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिले आहे. त्यामुळे किमान हा उद्योग तरी महाराष्ट्रात येईल का?, याची चर्चा सुरु झाली आहे.

- Advertisement -

टेस्ला कंपनी e vehicle निर्मितीत अग्रेसर आहे. ही कंपनी जगप्रसिद्ध आहे. या कंपनीला भारतात वाहन निर्मिती करायची आहे. त्यासाठी कंपनी भारतात जागा शोधत आहे. वाहन निर्मिती कारखाना उभा करताना आयात शुल्कात सवलत द्यावी, अशी अट कंपनीने मोदी सरकार समोर ठेवली होती. ही अट केंद्र सरकारने मान्य केली नाही. परिणामी कंपनीने भारतातील वाहन निर्मितीचा विचार स्थगित केला होता.

मात्र टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात जागा देण्याची तयारी उद्योगमंत्री सामंत यांनी दर्शवली आहे. महाराष्ट्रात मोठे उद्योग यावेत ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह आमची सर्वांचीच ईच्छा आहे. त्यामुळे टेस्ला कंपनीला महाराष्ट्रात वाहन निर्मिती कारखान्यासाठी जागा दिली जाईल, असे उद्योगमंत्री सामंत यांनी स्पष्ट केले.

- Advertisement -

महत्त्वाचे म्हणजे टेस्लानेही भारतात वाहन निर्मितीसाठी हालचाली सुरु केल्याची चर्चा आहे. परिणामी टेस्ला कंपनीला जादा सवलती देण्यास तयार असल्याचेही उद्योगमंत्री सामंत यांनी सांगितले.

भारतात e vehicle विकायची असल्यास टेस्ला कंपनीला भारतातच वाहन निर्मिती कारखाना उभारावा लागेल, असे मोदी सरकारने टेस्लाचे प्रमुख एलॉन मस्क यांना सांगितले आहे. त्यानुसार मस्क यांनी वाहन निर्मिती कारखाना भारतात उभारण्यास स्वारस्य दाखवल्याची चर्चा आहे.

दरम्यान, वेदांता-फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर निर्मिती प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला गेला. यासाठी जबाबदार कोण यावरून राजकीय वर्तुळात वादंग निर्माण झाला होता. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांना टार्गेट करत होते. महाविकास आघाडी सरकारने कधीच वेदांता-फॉक्सकॉन कंपनीला पॅकेज दिले नाही. मागील सरकारच्या काळात हाय पॉवर कमिटीची बैठक देखील झाली नाही. ही बैठक झाली असती तर वेदांता-फॉक्सकॉन कंपनीचा प्रकल्प राज्याबाहेर गेलाच नसता, असा दावा उदय सामंत यांनी केला होता. तर विरोधकांनी यासाठी शिंदे-फडणवीस सरकारला जबाबदार धरले होते.

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -