मुंबईत पुन्हा एकदा ‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) ॲक्शन मोडमध्ये आल्याचे पाहायला मिळत आहे. एनसीबीने अलिकडेच गुप्त माहितीच्या आधारे कृणाल राजपूत नावाच्या व्यक्तीकडून पार्सल ताब्यात घेतले. ते उघडले असता त्यामध्ये ९१० ग्रॅम मारिजुआना हा अंमली पदार्थ असल्याची माहिती समोर येत आहे.
‘नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो’च्या (एनसीबी) मुंबई संचालनालयाने हा साठा जप्त केला असून, त्याचे बाजार मूल्य आठ कोटी रुपये होते. याप्रकरणी अभिजित चौधरी, जयेश मिश्रा, सोहम मिस्त्री व निकीता मिस्त्री या तरुण-तरुणींच्या टोळीला अटक केली. याखेरीज एक आलिशान गाडीदेखील जप्त केली. ही गाडी चौघांपैकी एका आरोपीची आहे. हे सर्व आरोपी चांगल्या कुटुंबातील आहेत.
हे अंमली पदार्थ अहमदाबाद येथे पाठवले जाणार होते. तेथील हवाला व्यापारी तल्हा याकूब पटेल याने ते मागवले होते व त्यासाठी या चौघांना दोन लाख रुपये देण्यात आले होते, असे या चौघांच्या चौकशीदरम्यान समोर आले. आर्यन खान प्रकरण, त्यानंतर स्थापन झालेली दक्षता समिती आदी प्रकरणावरून चर्चेत आल्यामुळे एनसीबीच्या कारवाया थंडावल्या होत्या. मात्र आता साडेतीन महिन्यांनी एनसीबी पुन्हा सक्रीय झाल्याचे दिसून येत आहे.
मागील दोन वर्षात म्हणजेच ऑगस्ट २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत एनसीबी मुंबईने अंमली पदार्थ दलाल तसेच तस्करांविरुद्ध धडाकेबाज कारवाया केल्या होत्या. त्यानंतर आर्यन खान प्रकरणानंतर चौकशी सुरू झाल्याने या कारवाया थंडावल्या होत्या. त्यानंतर एनसीबीने २१ जानेवारी २०२२ रोजी अंधेरीत एक कारवाई केली. २८ जानेवारी २०२२ रोजी सुशांतसिंह राजपूत प्रकरणातील फरार दलालाला अटक केली. त्यानंतर १२ फेब्रुवारी २०२२ रोजी खोल समुद्रात नौदलाच्या सहाय्याने ८०० किलो अंमली पदार्थ जप्त केले होते.
हेही वाचा – शहरात १६ वर्षीय युवतीसह चौघांची आत्महत्या