दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केलेला २६ वर्षाचा जवान औरंगजेब तुम्हाला आठवत असेल? नाही का? त्याच औरंगेबच्या हत्येचा बदला घेण्यासाठी औरंगजेबच्या गावातील ५० मित्रांनी चक्क परदेशातील नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. यावरच ते थांबले नाहीत तर त्यानंतर ते काश्मीरमधील मुळ गावी दाखल देखील झाले आहेत. यावर विचारले असता आम्हाला आमच्या मित्राच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया या मित्रांनी दिली. औरंगजेबचे ५० मित्र आखाती देशामध्ये नोकरीला होते. पण औरंगजेबचे अपहरण करून हत्या झाल्याचे कळल्यानंसतर त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर ते त्यांच्या मेहदर या मुळ गावी दाखल देखील झाले. औरंगजेबच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनी देखील औरंगजेबच्या हत्येचा बदला घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. त्यानंतर मित्रांनी देखील आता आखाती देशातील नोकरी सोडून भारतात परतने पसंत केले आहे. सैन्यदल किंवा पोलीस दलामध्ये भरती होऊन औरंगजेबच्या हत्येचा बदला घेण्याचा मानस या ५० मित्रांनी व्यक्त केला आहे.
औरंगजेबचे अपहरण करून हत्या
१४ जुन रोजी २४ वर्षीय औरंगजेब रमजान निमित्त घरी परतत होता. त्यावेळी रस्त्यावरच दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण केले. त्यानंतर त्याचा १.१५ मिनिटाचा व्हिडीओ देखील शूट केला. सोशल मीडियावर देखील हा व्हिडीओ व्हायरल करण्यात आला होता. या व्हिडीओमध्ये दहशतवादी औरंगजेबकडे चौकशी करत असल्याचे दिसत आहे. औरंगजेबने देखील त्यांना आपण भारतीय सैन्यामध्ये जवान असल्याचे अभिमानाने सांगितले आहे. चौकशीअंती औरंगजेबची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. या साऱ्या प्रकारामुळे पुलवामा जिल्ह्यामध्ये संतापाची लाट उसळली होती. औरंगजेबच्या हत्येचा बदला घ्या अशी मागणी काश्मीर खोऱ्यातून जोर धरू लागली आहे. शिवाय, औरंगजेबच्या वडिलांनी देखील माझ्या मुलाच्या हत्येचा बदला घ्या अशी मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली होती. लष्करप्रमुख आणि संरक्षणमंत्र्यांनी देखील औरंगजेबच्या कुटुंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले होते. त्यानंतर आता मित्राच्या हत्येचा बदला घेण्यासाठी औरंगजेबच्या ५० मित्रांनी परदेशातील नोकरीवर लाथ मारली आहे. पोलीस किंवा सैन्यामध्ये भरती होऊन त्यांना औरंगजेबच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे. मोहम्मद किरमत यापैकीच एक असून त्याने देखील आम्हाला आमच्या मित्राच्या हत्येचा बदला घ्यायचा आहे अशी प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही पोलीस किंवा सैन्य दलामध्ये भरती झाल्यास औरंगजेबच्या आत्म्याला शांती मिळेल असे देखील या मित्रांचे म्हणणे आहे.