जम्मू-काश्मीरच्या पुलवामा येथे १४ फेब्रुवारीला मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात भारताचे ४० पेक्षा जास्त जवान शहीद झाले होते. या हल्ल्याच्या १३ दिवसानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारीला पाकिस्तानमध्ये शिरुन दहशतवाद्यांच्या तळावर हल्ला केला. या हल्ल्यात २०० ते ३०० दहशतवादी मारले गेले असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान, हा हल्ला खरच झाला का? यावर विरोधी पक्षाच्या नेत्यांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याच पार्श्वभूमीवर भारतीय हवाई दलाने या हल्ल्याचे पुरावे केंद्र सरकारकडे सुपूर्द केले आहेत.
८० टक्के बॉम्ब अचूक निशाण्यावर
भारतीय हवाई दलाने केंद्र सरकारकडे १२ पानांचा अहवाल सादर केला आहे. यासोबत हल्ला करण्यात आलेल्या ठिकाणाचे म्हणजे बालाकोटचे हाय रिझोल्युशन असलेले काही फोटो पुरावा म्हणून जोडण्यात आले आहेत. हे फोटो वायूसेनेने सॅटेलाईट आणि रडारच्या सहाय्याने घेतले आहेत. वायूसेनेने आपल्या अहवालात म्हटले आहे की, जे बॉम्ब विमनातून पाडण्यात आले आहेत, ते थेट इमारतींच्या आतमध्ये जाऊन पडले. त्यामुळे जे नुकसान झाले आहे ते या इमारतींच्या आत झाले आहे. या हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांचे जवळजवळ सर्व तळे उद्धवस्त करण्यात भारताला यश आले आहे. वायूसेनेने सोडलेले ८० टक्के बॉम्ब हे अचूक निशाण्यावर बसले आहेत, असे हवाई दलाकडून सांगण्यात आले आहे.