केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (amit shah), पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (mamata banerjee ), सुवेंदू अधिकारी आणि दिलीप घोष या राजकीय व्यक्तींची नवे पुन्हा चर्चेत आली आहेत. मात्र ही चर्चा कोणत्याही राजकीय कारणासाठी नसून ती शिक्षक पात्रता परीक्षेच्या गुणवत्ता यादीमुळे चर्चा सुरु झाली आहे. या सर्व नेत्यांनी 2014 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा (TET – Teachers Eligibility Test ) उत्तीर्ण केली अशी माहिती समोर आली आहे. पश्चिम बंगालमध्ये मागील काही महिन्यांपासून टीईटी घोटाळा चर्चेत आहे त्यावरूनच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या सरकारवर विरोधकांकडून आरोप करण्यात येत आहेत.
पश्चिम बंगाल (west bengal) प्राथमिक शिक्षण मंडळाने 2014 मध्ये शिक्षक पात्रता परीक्षा घेतली होती. (TET 2014) त्या परीक्षेची गुणवत्ता यादी आता समोर आली आहे. या यादीत अमित शाह, ममता बॅनर्जी यांच्यासोबत अनेक राजकीय नेत्यांच्या नावाचा समावेश आहे. या गुणवत्ता यादीनुसार, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना 92 गुण मिळाले. तर, तृणमूल काँग्रेसचे नेते अभिषेक बॅनर्जी यांना 98 गुण मिळाले. पश्चिम बंगालचे विद्यमान विरोधी पक्षनेते आणि तत्कालीन तृणमूल काँग्रेसचे नेते सुवेंदू अधिकारी यांना 100 गुण मिळाले आहेत. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सृजन चक्रवर्ती यांना 99 गुण मिळाले असा दावा एका ट्वीटमधून भाजपा नेत्यांकडून करण्यात आला आहे.
भाजपाचे (bjp) पश्चिम बंगालमधील नेते सुकांता मुझुमदार यांनी या संदर्भात एका ट्विटला रिट्वीट करत पश्चिम बंगाल सरकारवर आरोप केले आहेत. पश्चिम बंगालमधील शैक्षणिक गुणवत्ता ढासळत आहे आणि भ्रष्टाचार जास्त प्रमाणात आहे असे त्यांनी म्हटले. राज्य सरकार असला प्रकार कधी थांबवणार आहे? असा प्रश्न उपस्थित करत सामान्य उमेदवारांच्या, जनतेच्या आयुष्याशी खेळणे बंद करावे अशी मागणी त्यांनी केली आहे.
पश्चिम बंगाल प्राथमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष गौतम पाल यांच्या नावाचाही या यादीत समावेश होता. यासंदर्भांत त्यांना विचारले असता, त्यांनी म्हटले की, या गुणवत्ता यादीतील उमेदवार खरे असून त्यात कोणत्याही खोट्या नावांचा समावेश केलेला नाही. पश्चिम बंगालमध्ये या नावाचे उमेदवार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान हीच यादी सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ही नावे बंगालमध्ये सामान्यपणे आढळतात. त्यामुळे या यादीमध्ये असलेली नावे खरी आहेत की बोगस हे पाहण्याची जबाबदारी तपास यंत्रणांची आहे. त्यांच्या तपासातून सत्य माहिती समोर येईल, असेही बोलले जात आहे.
हे ही वाचा – या सगळ्या राजकारणात शकुनी कोण? जितेंद्र आव्हाडांचा सवाल