नवी दिल्ली : कर्नाटकात बुधवारी मतदान (Karnataka election) होणार आहे. या निवडणुकीच्या प्रचाराचा आज, सोमवारी शेवटचा दिवस आहे. शनिवार आणि रविवारी विविध पक्षांच्या प्रमुख नेत्यांनी प्रचाराचा धुरळा उडवून दिला होता. त्याचवेळी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या वक्तव्याबाबत भाजपाने (BJP) केंद्रीय निवडणूक आयोगाकडे (Election Commission of India) धाव घेतली आहे.
काँग्रेसने शुक्रवारी एक ट्वीट केले होते, ज्यात सोनिया गांधी कर्नाटकात प्रचार करताना दिसत आहेत. कर्नाटकच्या प्रतिष्ठेला, सार्वभौमत्वाला किंवा अखंडतेला काँग्रेस कोणाकडूनही धक्का लागू देणार नाही, असे सोनिया गांधी यांनी 6.5 कोटी कन्नडिगांना उद्देशून म्हटले असल्याचे या ट्वीटमध्ये नमूद केले आहे.
CPP Chairperson Smt. Sonia Gandhi ji sends a strong message to 6.5 crore Kannadigas:
“The Congress will not allow anyone to pose a threat to Karnataka’s reputation, sovereignty or integrity.” pic.twitter.com/W6HjKYWjLa
— Congress (@INCIndia) May 6, 2023
या ट्वीटबाबत भाजपाने आता निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे. काँग्रेस देशाचे विभाजन करण्याचे काम करत असल्याचे भाजपाने निवडणूक आयोगाकडे केलेल्या तक्रारीत म्हटले आहे. निवडणूक आयोगाकडे ही तक्रार घेऊन जाणाऱ्या भाजपाच्या शिष्टमंडळात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, भाजपाचे मीडिया प्रभारी अनिल बलूनी आणि पक्षाचे नेते तरुण चुग यांचा समावेश होता.
निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर भूपेंद्र यादव म्हणाले, ‘आम्ही निवडणूक आयोगाला एका गंभीर मुद्द्याबाबत निवेदन सादर केले आहे. आचार संहितेअंतर्गत, सर्व राजकीय पक्षांच्या प्रचाराच्या वेळी भारताच्या लोकशाहीच्या दृष्टीने एकता आणि अखंडतेला बळकटी देण्यासाठी निवडणूक आयोगाने मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत. काँग्रेस पक्षाने आपल्या सोशल मीडिया पोस्टवर जाणीवपूर्वक अशा शब्दांचा वापर केला आहे की, जे शब्द भारताच्या संदर्भात वापरला जातो, असे आरोप भूपेंद्र यादव यांनी केला.
Outside the office of Election Commission of India after lodging #BJP complaint against Smt Sonia Gandhi‘s comment which violated the spirit of Indian constitution and that of the sovereign Indian republic by using expression “sovereign Karnataka”. pic.twitter.com/9NiVFRlD8o
— Dr Jitendra Singh (@DrJitendraSingh) May 8, 2023
”टुकडे टुकडे गँग काँग्रेसचा अजेंडा आहे. काँग्रेस खोट्या मुद्द्याचा आधार घेऊन प्रचार करत आहे, असे सांगून भूपेंद्र यादव म्हणाले की, निवडणूक आयोगाने आमचा मुद्दा गांभीर्याने घेतला आहे. आजही काँग्रेस आपल्या जाहिरातींमध्ये विविध आरोप करत आहे, पण त्या आरोपांचे पुरावे निवडणूक आयोगाला देऊ शकलेली नाही. आता याचे उत्तर कर्नाटकातील जनता निवडणुकीतून देईलच, पण काँग्रेसकडून होत असलेल्या या देशविरोधी कृत्यावर निवडणूक आयोग कारवाई करेल, अशी अपेक्षा असल्याचे त्यांनी सांगितले.