गेल्या काही काळापासून अगदी शुल्लक कारणांमुळे घटस्फोट होत असल्याचे समोर आले आहे. घटस्फोटाच्या प्रमाणात भारताची स्थिती इतर देशांच्या तुलनेत चांगली आहे. गेल्या काही वर्षांतील आकडेवारी पाहिली तर हा वेग वाढल्याचे दिसून येत आहे. वेग वाढला आहे पण घटस्फोटाची कारणे ही धक्कादायक आहेत. आता नवरा बायको भांडताना बोलून गेलेला एक शब्दही घटस्फोटाला कारणीभूत ठरू शकतात. होय. तुमचा विश्वास बसणार नाही. पण यावर कलकत्ता उच्च न्यायालयाने निकाल दिलाय.
जर एखादी पत्नी आपल्या पतीला भित्रा, बेकार आणि बिन कामाचा असं म्हणत असेल तर तो घटस्फोटाचा आधार असू शकतो, असा निकाल कलकत्ता उच्च न्यायालयाने दिलाय. तसंच एखादी पत्नी तिच्या नवऱ्याला त्याच्या आई-वडिलांपासून वेगळं राहण्यासाठी भाग पाडत असेल, तर तोही घटस्फोटाचा एक मजबूत आधार होऊ शकतो, असंही न्यायालयाने स्पष्ट केलंय.
एका खटल्याची सुनावणी न्या. सौमेन सेन आणि न्या. उदय कुमार यांच्या खंडपीठासमोर पार पडली. यात नवऱ्याने त्याची पत्नी अपमानास्पद वागणूक आणि छळ करत असल्याची तक्रारीवरून घटस्फोट मंजूर केला होता. या आदेशाला आव्हान देणारी याचिका पत्नीने कलकत्ता उच्च न्यायालयात दाखल केली होती. या खटल्यावर सुनावणी देताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.
हिंदुस्थानी कुंटुंबात मुलाचं लग्न झाल्यावरही तो आपल्या आई वडिलांकडे राहणं ही खूपच सामान्य बाब आहे. पण जर त्याची पत्नी त्याला आई-वडिलांसोबत राहण्यापासून परावृत्त करत असेल तर त्याचं काहीतरी न्याय्य आणि तर्कशुद्ध कारण असायला हवं, फक्त पत्नीच्या इच्छेखातर आपल्या आई वडिलांपासून लांब राहणं ही मुलासाठी सामान्य बाब नसते. तसंच त्यावरून आपल्या पतीला भित्रा, बेकार किंवा बिनकामाचा असं म्हटल्यास तो घटस्फोटाचा एक मजबूत आधार असू शकतो, असं न्यायालयाने स्पष्ट केलंय.
“भारतीय संस्कृती आपल्या आईवडिलांना सांभाळणं हे मुलाचं कर्तव्य आहे, असं सांगते. पत्नीची इच्छा होती की पतीने आपल्या कुटुंबापासून विभक्त होणे ही योग्य प्रथा नाही,”, असे खंडपीठाने नमूद केले आहे. या प्रकरणामध्ये पतीला विभक्त होण्यास सांगण्यासाठी पत्नीने क्षुल्लक घरगुती समस्या आणि आर्थिक गरजांच्या पूर्ततेशी संबंधित समस्या आणि अहंकारावरुन होणारे वाद अशी कारणं होती. पती केवळ त्याच्या शांत वैवाहिक जीवनासाठी त्याच्या पालकांच्या घरातून भाड्याच्या घरात गेला होता.
ही पत्नीची तिच्या पतीसोबत सासरपासून वेगळे राहण्याची इच्छा न्याय्य कारणांवर आधारित नाही, कारण ती क्रूरता आहे. सामान्यतः कोणताही पती पत्नीचं असं कृत्य सहन करत नाही आणि कोणताही मुलगा त्याचे पालक आणि इतर कुटुंबातील सदस्यांपासून विभक्त होऊ इच्छित नाही. पत्नीने पतीला कुटुंबापासून विभक्त होण्यास भाग पाडण्याचा सततचा प्रयत्न पतीसाठी त्रासदायक ठरेल, असं मत खंडपीठाने व्यक्त केलं आहे.