पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानचा बदला घेतला. पाकिस्तानच्या हद्दीमध्ये घुसून भारतीय हवाई दलाने जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचे तळ उध्वस्त केले. या नंतर पाकिस्तानने भारतामध्ये घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला. सध्या दोन्ही देशांमध्ये तणावाची परिस्थिती आहे. पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरु आहे. जम्मू-काश्मीरच्या खोऱ्यात लपून बसलेले दहशतवाद्यांविरोधत जम्मू-काश्मीर पोलिसांनी शोध मोहिम सुरु केली आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिसांनी पुलवामा जिल्ह्यातल्या त्रालमधील वेगवेगळ्या गावात छापेमारी करत जमात-ए-इस्लामी या संघटनेच्या सहा सदस्यांना अटक केली आहे. जमात-ए-इस्लामी ही फुटीरतावाद्यांची संघटना आहे.
१५ जणांना या आधी अटक
केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये असणाऱ्या जमात-ए-इस्लामी ही संघटना बेकायदेशीर असल्याचे सांगत या संघटनेवर ५ वर्षाची बंदी घातली आहे. या संघटनेवर कश्मीरमध्ये हिंसा भडकवण्यासारखे गंभीर आरोप आहेत. पोलिसांनी या संघटनेच्या सहा सदस्यांना अटक करण्यापूर्वी याच संघटनेच्या १५ जणांना अटक करण्यात आली होती. गृहमंत्रालयाने सामाजिक आणि धार्मिक संस्थांवर बंदी घातल्यानंतर सुरक्षा दलाने ही कारवाई केली आहे. गेल्या आठवड्यात केलेल्या कारवाई पोलिसांनी १०० हून अधिक सामाजिक आणि धार्मिक संस्थेंच्या शेकडो कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना ताब्यात घेतले होते.
काश्मीरमध्ये हिंसा भडकवल्याचा आरोप
जम्मू-काश्मीरमध्ये जमात-ए-इस्लामी या संघटनेची स्थापना १९४२ साली झाली होती. या संघटनेवर आतापर्यंत तीन वेळा बंदी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार, जमात-ए-इस्लामी ही राष्ट्रविरोधी काम करणे तसंच कश्मीरमध्ये हिंसा भडकवण्याचे आरोप आहेत त्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीमध्ये गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती. त्यामध्ये असे सांगितले होते की, ही संघटना देशातील सुरक्षा आणि सार्वजनिक व्यवस्थेसाठी घातक आहे.