नवी दिल्ली : काँग्रेसच्या ‘लोकशाही वाचवा’ या कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची घटना छत्तीसगडमधील बिलासपूरमधून याठिकाणी घडली आहे. काँग्रेसचे नेते मोठ्या संख्येने स्टेजवर उपस्थित असल्यामुळे ही घटना घडली असून काही नेत्यांना दुखापतही झाली आहे. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.ॉ
काँग्रेसकडून देशभरात अनेक राज्यांमध्ये ‘लोकशाही वाचवा’ मशाल रॅली काढण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर छत्तीसगडमधील बिलासपूर येथे ‘लोकशाही वाचवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मशाल रॅली संपल्यानंतर काँग्रेस नेते त्याठिकाणी जमलेल्या जनतेला स्टेजवरून संबोधित करत होते. मात्र स्टेजवर काँग्रेस नेत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केल्यामुळे स्टेज अचानक कोसळला आणि यात काही नेत्यांना किरकोळ जखमा आल्यामुळे ते सध्या रुग्णालयात उपचार घेत आहेत. स्टेज कोसळ्याचा व्हिडिओही समोर आला आहे. यावेळी काँग्रेस नेते मोठ्याने घोषणा देताना दिसत आहेत.
रविवारी काँग्रेसच्या ‘सेव्ह डेमोक्रसी’ कार्यक्रमादरम्यान स्टेज कोसळल्याची घटना घडली Video#Congress #Video pic.twitter.com/XRiaxUU0pO
— Ankita Shantinath Khane (@KhaneAnkita) April 3, 2023
2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान राहुल गांधी यांनी कर्नाटकातील कोलारमध्ये “सर्व चोरांची आडनावे मोदी कशी आहेत?”असे वक्तव्य केले होते. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर सुरत पश्चिमेतील भाजप आमदार पूर्णेश मोदी यांनी त्यांच्यावर मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात राहुल गांधींना सुरत जिल्हा न्यायालयाने दोषी ठरवून दोन वर्षांची शिक्षा सुनावली, त्यामुळे त्यांची खासदारकीही गेली आणि आता त्यांना त्याचा सरकारी बंगलाही खाली करावा लागणार आहे. राहुल गांधींची खासदारकी गेल्यानंतर काँग्रेसकडून देशभर ‘लोकशाही वाचवा’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
राहुल गांधींची भारतीय लोकशाहीवर टीका
भारतीय पत्रकार संघाने (आयजेए) लंडनमध्ये आयोजित केलेल्या ‘इंडिया इनसाइट्स’ या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधींनी पत्रकारांना सांगितले की, भारतीय लोकशाही धोक्यात आहे. भारतात लोकशाही संरचनेवर वारंवार होत असलेल्या क्रूर हल्ल्यामुळे भारत जोडो यात्रा आवश्यक बनली आहे. प्रसारमाध्यमे, संस्थात्मक संरचना, न्यायव्यवस्था, संसद या सर्वांवर भारतात हल्ले होत आहेत. त्यामुळे लोकांचे प्रश्न सामन्य पद्धतीने मांडणे आम्हाला खूप अवघड जात आहे. राहुल गांधींच्या या वक्तव्यानंतर भाजपाने देशाची माफी मागावी अशी मागणी केली होती.