कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर देशातील अनेक राज्यातील शाळा सुरू करण्यात आल्यात. विद्यार्थी शाळेत जाऊ लागले आहेत. मात्र कोरोनाच्या तिसऱ्या लाटेआधीच विद्यार्थ्यांच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे. बंगळूरुमध्ये एका आठवड्यात तब्बल ३०० शालेय विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. यामुळे विद्यार्थी पालक त्याचप्रमाणे शिक्षक देखील चिंतेत आले आहेत. बंगळूरू मध्ये गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढताना दिसत आहेत. बंगळूरुच नाही तर देशातील इतर राज्यातही शाळा सुरू करण्यात आल्यात तिथे देखील विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत.
बंगळूरू प्रशासनाद्वारे समोर आलेल्या आकडेवारीनुसार, ० ते ९ वर्षावरील जवळपास १२७ आणि १० ते १९ वर्ष वयातील १७४ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हा आकडा ५ ऑगस्ट ते १० ऑगस्ट दरम्यानचा आहे.
‘या’ राज्यातील विद्यार्थीही कोरोनाच्या विळख्यात
कर्नाटकमध्ये देखील, शाळा कॉलेज सुरू करण्यात आल्यानंतर तिथे देखील विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचे प्रमाण वाढले. हिमाचल प्रदेशमध्ये देखील ६२ विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळले होते. पंजाबमध्ये एकून २७ शाळांमधील विद्यार्थी कोरोनाच्या विळख्यात आहेत.
तर हरियाणामध्ये देखील ९ वी ते १२ वीच्या शाळा २ ऑगस्ट पासून सुरू करण्यात आल्या होत्या. शाळामध्ये वारंवार वाढत असलेल्या कोरोना रुग्णांमुळे सरकारसमोर आणखी एक नवीन प्रश्न उभा राहिला आहे. विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे हिमाचल प्रदेशमधील शाळा २२ ऑगस्टपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्याचप्रमाणे पंजाबमध्ये देखील शाळा बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत.
केरळ,महाराष्ट्र,कर्नाटक,तमिळनाडू सारख्या राज्यात सध्या कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे संपली नसून प्रत्येक राज्य सरकारने सतर्क राहण्याचा इशारा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आला आहे.
हेही वाचा – Coronavirus: कोरोनावरील उपचारांसाठी आता गंगेच्या पाण्याचा वापर? तज्ज्ञांचा खुलासा