देशात वेगाने लसीकरण मोहीम सुरू आहे. यादरम्यान आजपासून १२ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणाला सुरुवात होणार आहे. ‘बच्चे सुरक्षित तो देश सुरक्षित’ असे म्हणत केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी ट्वीट करून सर्व पालकांनी आपल्या मुलांचे लसीकरण जरूर करा अशी विनंती केली आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवियांनी ट्वीट करून सांगितले की, ‘मुले सुरक्षित तर देश सुरक्षित. मला सांगताना खूप आनंद होत आहे की, १६ मार्चपासून १२ ते १३ आणि १३ ते १४ वयोगटातील मुलांचे कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणास सुरुवात होत आहे. शिवाय ६० वर्षांवरील सर्व लोकं आता बूस्टर डोस घेऊ शकतात. त्यामुळे माझे मुलांच्या पालकांना आणि ६० वर्षांवरील लोकांना लसीकरण करण्याची विनंती आहे.’
आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, १२ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना बायोलॉजिकल-ईची Corbevax लस दिली जाणार आहे. लसीचे दोन्ही डोस २८ दिवसांच्या अंतराप्रमाणे दिले जातील. याबाबतची गाईडलाईन सोमवारी केंद्राने राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पाठवली आहे. यानुसार देशात १२ वर्ष आणि १३ वर्ष वय असलेले ७.७४ कोटी मुलं आहेत. मुलांच्या लसीकरणांसाठी कोविन अॅपवर रजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे. सर्व मुलांना लस मोफत दिली जाणार आहे.
पालकांमध्ये भीतीही आणि विश्वासही
मुलांना लस देण्याबाबत काही पालक चिंतेत आहेत तर काही पालकांच्या मनात अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. पण जास्त करून काही पालकांना लसीकरणावर विश्वास आहे. १२ वर्ष ते १४ वर्ष वयोगटातील मुलांना लस दिली जाणार यामुळे काही पालक खुश होते. आजपासून मुलांना दिली जाणारी लस ही हैदराबादच्या बायोलॉजिकल ई-कंपनीने विकसित केली आहे.
हेही वाचा – Covid-19 Vaccine: मुंबईत आजपासून १२ ते १४ वयोगटातील मुलांचे लसीकरण कोणत्या केंद्रावर होणार? जाणून घ्या