२३ मार्च रोजी देशभरात लॉकडाऊन लागू झाल्यापासून देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय अशा दोन्ही प्रकारची प्रवासी विमान वाहतूक बंद करण्यात आली होती. आता दोन महिन्यांनंतर पुन्हा एकदा देशातल्या विविध विमानतळांवरून विमानं उड्डाण घेणार आहेत. बुधवारी नागरी उड्डाण मंत्री हरदीपसिंग पुरी यांनी येत्या २५ मेपासून देशात पुन्हा विमानवाहतूक सुरू होणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र, त्यासाठी आता काही नियम जारी करण्यात आले आहेत. त्या नियमांनुसारच हा प्रवास होणार आहे. या नुसार २५ मेपासून फक्त देशांतर्गत विमान वाहतूक सुरू होणार असून आंतरराष्ट्रीय विमान वाहतूक अजूनही बंदच राहणार आहे.
काय आहेत नियम?
१) नियमावलीनुसार देशातल्या विमान कंपन्या त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या विमानांपैकी फक्त एक तृतीयांश विमान उड्डाणंच करू शकतील.
२) ही विमान वाहतूक मेट्रो ते मेट्रो शहरं आणि मेट्रो ते नॉन मेट्रो शहरं अशी होईल. या दोन्ही श्रेणींसाठी वेगवेगळे नियम असतील. मेट्रो शहरांमध्ये दिल्ली, मुंबई, चेन्नई, कोलकाता, बंगळुरूसारखी मोठी शहरं असतील.
३) सुरुवातीला विमानतळावरचा देखील फक्त एक तृतीयांश हिस्साच उघडला जाईल.
४) विमान वाहतुकीच्या मार्गांचे प्रवास वेळेनुसार ७ गट ठरवण्यात आले आहेत.
१ – ४० मिनिटांपेक्षा कमी कालावधी – २००० ते ६००० भाडं
२ – ४० मिनिट ते ६० मिनिटांचा कालावधी – २५०० ते ७५०० भाडं
३ – ६० मिनिट ते ९० मिनिटांचा कालावधी – ३ हजार ते ९ हजार भाडं
४ – ९० मिनिट ते १२० मिनिटांचा अर्थात २ तासांचा कालावधी – ३५०० ते १० हजार भाडं
५ – २ तास ते अडीच तासांचा कालावधी – ४५०० ते १३ हजार भाडं
६ – २.५ तास ते ३ तासांचा कालावधी – ५५०० ते १५७०० भाडं
७ – ३ तास ते ३.५ तासांचा कालावधी – ६५०० ते १८६०० भाडं
५) यानंतर विमान वाहतुकीसाठीचं प्रवास भाडं देखील निश्चित करण्यात आलं आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत हे प्रवासभाडं लागू असेल. उदा. मुंबई ते दिल्ली या प्रवासासाठी किमान तिकीट ३५०० आणि जास्तीत जास्त तिकीटाची किंमत १० हजार रुपये निश्चित करण्यात आली आहे. प्रवाशांना लगेच आर्थिक अडचणीचा सामना करावा लागू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
६) विमानात सोशल डिस्टन्सिंग पाळण्यासाठी तीन शिटांच्या मधलं सीट रिकामं ठेवलं जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, तसं होणार नाहीये. कारण त्याचा भार प्रवाशांवर पडू शकतो. मात्र, प्रत्येक प्रवासानंतर विमानाचं निर्जंतुकीकरण केलं जाणार आहे.
७) विमान प्रवास करताना…
दोन तास आधी विमानतळावर पोहोचावं लागेल
प्रत्येक प्रवाशाकडे आरोग्य सेतू मोबाईल अॅप्लिकेशन असायला हवं
प्रवासाच्या वेळेच्या ४ तास आधीपर्यंतच विमानतळावर प्रवेश मिळेल
प्रवाशांना मास्क, हँड ग्लोव्ज घालणं, सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक
विमानतळ कर्मचाऱ्यांना पीपीई किट घालणं आवश्यक असेल
विमानाच्या आतमध्ये देखील आवश्यक ती काळजी घेणं सक्तीचं
Recommencement of domestic flights- ticket fare to be between Rs 2000 and Rs 18,600 for 7 classes of sectors: Ministry of Civil Aviation pic.twitter.com/QCTpvNukOo
— ANI (@ANI) May 21, 2020