कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे केंद्र सरकारने देशांतर्गत विमान वाहतूक प्रवासी क्षमतेवर अनेक मर्यादा घातल्या होत्या. मात्र देशात आता कोरोना रुग्णसंख्येत मोठ्याप्रमाणात घट होत असल्याने नागरी उड्डाण मंत्रालयाने देशांतर्गत विमान उड्डाणांमधील प्रवासी क्षमतेची मर्यादा काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आजपासून देशांतर्गत विमान उड्डाण हे पूर्ण प्रवासी क्षमतेने होणार आहे. नागरी उड्डाण मंत्रालयाच्या माहितीनुसार, १८ ऑक्टोबरपासून म्हणजे आजपासून देशांतर्गत व्यावसायिक उड्डाणांमधील प्रवाशांच्या क्षमतेवरील निर्बंध हटवले जातील.
या निर्णयामुळे प्रवासी वाहतूक विमान १०० टक्के प्रवासी क्षमतेने उड्डाण घेण्याचा मार्ग मोकळा झाला. पूर्ण प्रवासी क्षमतेची परवानगी देण्यात आली असली तरी प्रवाश्यांना कोरोना नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे.
यापूर्वी केंद्र सरकारने देशांतर्गत उड्डाणांची प्रवासी क्षमता ७२.५ टक्क्यांवरून वाढवून ८५ टक्के केली होतीय त्यानंतर नागरी उड्डाण मंत्रालयाने (MOA) जुलैमध्ये देशांतर्गत विमान प्रवासी वाहतूकीची क्षमता ५० टक्क्यांवरून ६५ टक्क्यांपर्यंत वाढवली. तर ९ ऑक्टोबरला देशांतर्गत २ हजार ३४० विमान सेवा संचालित करण्यात आली.
कोरोनामुळे २३ मार्च २०२० पासून आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर बंदी घालण्यात आली होती, परंतु ‘वंदे भारत मिशन’अंतर्गत मे २०२० पासून विशेष आंतरराष्ट्रीय विमान प्रवासास सुरुवात झाली. याशिवाय काही निवडक देशांसोबत ‘द्विपक्षीय’ एअर बबल ‘ कराराअंतर्गत जुलै २०२० पासून विमान उड्डाणास परवानगी देण्यात आली. मात्र आजपासून १०० टक्के क्षमतेने देशांतर्गत विमान उड्डाणे चालविण्यास परवानगी देण्यात आली.