केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रूग्णांचा आकडा ७० हजारांच्या पुढे गेले आहे. आतापर्यंत देशात कोरोनाची लागण झालेल्या एकूण रूग्णांची संख्या ७० हजार ७५६ वर पोहोचली आहे. त्यापैकी २२ हजार ४५४ लोकांना उपचारानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला असून देशात कोरोनाचा संसर्ग झालेल्यांची संख्या ४६ हजारांवर गेली आहे. कोरोनामुळे आतापर्यंत देशात २ हजार २९३ लोकांचा बळी गेला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितले की, देशातील कोरोना रुग्णांच्या सुधारणेतील फरक हा दिवसेंदिवस चांगला होताना दिसतोय. सध्या रिकव्हरीचा दर हा ३१.७ टक्के असा आहे. कोरोना विरूद्धच्या लढ्यात असणारा देशाचा मृत्यू दर जगातील सर्वात कमी आहे. मंगळवारी हा मृत्यू दर जवळपास ३.२ टक्के असा असून बर्याच राज्यात हा दर आणखी कमी असल्याचे समोर आले आहे.
In the fight against #COVID19 our mortality rate is about the lowest in the world. Today the mortality rate is around 3.2%, in several states it is even less than this. Global fatality rate is around 7-7.5%: Union Health Minister Dr Harsh Vardhan https://t.co/rpJP0vyMIa
— ANI (@ANI) May 12, 2020
दरम्यान, जागतिक मृत्यू दर साधारण ७ ते ७.५ टक्के आहे. त्याचबरोबर राजस्थानमध्ये आज कोरोनाच्या नव्या २१ रूग्णांची नोंद करण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ४ हजार ५६ कोरोना रुग्ण आढळले असून यापैकी १ हजार ५६३ रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह आहेत तर ११५ लोकांचा कोरोनाने बळी गेला असल्याची माहिती राजस्थान आरोग्य विभागाने दिली आहे. तर राज्यात आतापर्यंत १ लाख ८४ हजार ८५३ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.