मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये शुक्रवारी रात्री भीषण आगीची घटना घडली आहे. विजयनगर कॉलनीतील एका तीन मजली इमारतीला ही भीषण आग लागली आहे. या आगीत आत्तापर्यंत 7 नागरिकांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर ८ नागरिक जखमी झाले आहेत. मृतांमध्ये सहा पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. दरम्यान सर्व जमखींना एमवाय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, विजय नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तीन इमारतीला दुपारी ३ वाजता भीषण आग लागली. आगीची माहिती मिळताच वरिष्ठ अधिकारी आणि अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. या कर्मचाऱ्यांकडून आता आग आटोक्यात आणण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु करण्यात आले मात्र तोपर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला होता. ईश्वर सिंह सिसोदिया, नीतू सिसोदिया, आशिष, गौरव आणि आकांक्षा अशी मृतांची नावे असून, दोन मृतांची नावे समजलेली नाहीत. फिरोज, मुनिरा, विशाल प्रजापती, अर्शत आणि सोनाली पवार अशी जखमींची नावे असून त्यांच्यावर एमवाय हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. इमारतीतील सर्व रहिवासी भाडेकरू होते. ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा संशय आहे.
Madhya Pradesh CM Shivraj Singh Chouhan expresses his condolences over the loss of lives due to a short circuit in Swarn Bagh Colony of Indore. pic.twitter.com/iEafEiucVa
— ANI MP/CG/Rajasthan (@ANI_MP_CG_RJ) May 7, 2022
इमारतीला लागलेल्या आगीत सात जणांचा मृत्यू झाल्यानंतर ही इमारत सील करण्यात आली आहे. सकाळीच फॉरेन्सिक विभागाची टीम तपासासाठी घटनास्थळी पोहोचली होती. आग कशी लागली याचा तपास पोलीस करत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त हरिनारायणाचारी मिश्रा, आमदार महेंद्र हरदिया घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तेथे पोहोचून परिस्थितीचा आढावा घेतला.
मृतांच्या कुटुंबीयांना 4-4 लाखांची आर्थिक मदत
सीएम शिवराज सिंह चौहान यांनी ट्विट करून लिहिले की, इंदूरच्या स्वर्णबाग कॉलनीमध्ये शॉर्ट सर्किटमुळे झालेल्या अपघातात अनेक मौल्यवान जीवांचा अकाली मृत्यू झाल्याची दुःखद बातमी मिळाली. दिवंगत आत्म्यांना आपल्या चरणी स्थान देवो आणि कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो आणि जखमींना लवकरात लवकर बरे करण्याची ईश्वर चरणी प्रार्थना करतो. इंदूरच्या आगीत मृत्यूची बातमी अत्यंत हृदयद्रावक आहे. त्याबाबत मी चौकशीचे आदेश दिले आहेत. निष्काळजीपणा आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल. दरम्यान मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
अग्निशमन दलाच्या जवानांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री तीनच्या सुमारास विजय नगर येथील स्वर्णबाग कॉलनीतील एका तीन मजली इमारतीला आग लागल्याची माहिती मिळताच पथक तात्काळ रवाना झाली. येथे आग तातडीने आटोक्यात आणण्यात आली, मात्र काही लोकांचा मृत्यू झाला होता. इमारतीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या मीटरमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने ही आग लागल्याचे समजते. वाहनांना आग लागल्याने आगीने भीषण रूप धारण केले. या इमारतीत विद्यार्थ्यांसह कुटुंबेही राहत असल्याचे त्यांनी सांगितले.