कोरोनाचा शिरकाव हा इंडियन प्रिमिअर लिगमध्ये सहभागी टीम्सच्या आणखी काही खेळाडूंना झाल्याने संपुर्ण IPL चा सीझन रद्द झाल्याची माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली आहे. त्यामुळे भारतातील यंदाचा आयपीएलचा हंगाम आता संपुष्टात आला आहे. वृद्धिमान साहा आणि अमित मिश्रा या खेळाडूनांही कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त आज समोर आले. त्यापाठोपाठच आयपीएलचे भारतातील सर्व सामने रद्द झाल्याची माहिती आयएनआय या वृत्त संस्थेने जाहीर केली आहे. याआधीच आयपीएलच्या टीममध्ये वरूण चक्रवर्ती, संदीप वॉरियर यांना कोरोनाची लाग झाल्याची बातमी समोर आली होती. याआधीच सोमवारी चेन्नई आणि राजस्थान रॉयल्स दरम्यानचा सामनाही काही खेळाडू कोरोना पॉझिटीव्ह आल्याने रद्द झाला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुल्का यांनी ही माहिती आयएनआय या वृत्तसंस्थेला देताना ही माहिती जाहीर केली आहे.
IPL suspended for this season: Vice-President BCCI Rajeev Shukla to ANI#COVID19 pic.twitter.com/K6VBK0W0WA
— ANI (@ANI) May 4, 2021
देशातील कोरोनाच्या महामारीचे संकट पाहता भारतात सुरू असलेल्या आयपीएलच्या सामन्यांमुळे बीसीसीआयवर अनेकांनी टीका केली होती. तर आयपीएल सामने सुरू राहण्यासाठीचा एक मोठा गट आयपीएलच्या बाजुने होता. खुद्द ऑस्ट्रेलियातील खेळाडूंनीही आय़पीएलचे समर्थन करत भारतात कोरोनाच्या परिस्थितीतही सुरक्षित वातावरण असल्याचा दावा केला होता. पण केकेआरमध्ये कोरोनाची लागण होण्याचा प्रकार समोर आल्यानंतर मात्र बायो बबलवर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले. त्यामध्येच सीएसके आणि हैद्राबाद दरम्यानचा सामना हा चैन्नईत तीन खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याने रद्द करण्यात आला. आज दिल्ली कॅपिटल्सच्या अमित मिश्रा आणि हैद्राबादच्या वृद्धीमान साहा यांनाही कोरोनाची लागण झाल्याची बातमी आज समोर आली. त्यानंतर बीसीसीआयच्या राजीव शुक्ला यांनी ANI या वृत्तसंस्थेला माहिती देत स्पष्ट केले की यंदाच्या आयपीएलच्या हंगामातील सर्व सामने आम्ही रद्द करत आहोत. त्यामुळेच यंदाचा आयपीएलचा उर्वरीत हंगाम संपुष्टात आला आहे.
बीसीसीआयला अनेकांनी यंदाचा आयपीएल हंगाम युएईमध्ये घेण्याचा सल्ला दिला होता. तर देशात कोरोनाचे सावट पाहता आयपीएलमधील उर्वरीत सर्व सामने मुंबईत घ्यावेत असाही रेटा सुरू झाला होता. पण मुंबईतील प्रशासनावर या सामन्यांचा आणखी ताण येऊ शकतो, त्यामुळे या सामन्यांना विरोध करणाराही सूर सुरू झाला होता. अखेर बीसीसीआयने देशातील कोरोनाच्या संकटाची परिस्थिती पाहता सर्व सामने रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.