आपल्या वादग्रस्त विधानांनी सतत चर्चेत असणारे माजी क्रिकेटपटू आणि काँग्रेस नेते सध्या पाकिस्तानसाठी हिरो बनले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी बिहारच्या कटियार येथील प्रचारसभेत सिद्धू यांनी मुस्लिम समुदायाला संबोधित करताना काँग्रेसला मतदान करण्याचे आवाहन केले. यावेळी सिद्धू यांनी केलेल्या वक्तव्यावरुन राजकीय वर्तुळात पुन्हा नवा वाद उफाळू शकतो. कारण त्यांच्या या वक्तव्याची दखल पाकिस्तानच्या माध्यमांनी घेतली आहे. त्यांच्या अनेक वक्तव्यांची दखल सध्या पाकिस्तानी माध्यमे घेत आहे. त्यामुळे सध्या पाकिस्तानी मीडियामध्ये नवजोस सिंह सिद्धू हिरो बनले आहेत.
नेमकं काय म्हणाले नवजोत सिंह सिद्धू?
नवजोत सिंह सिद्धू सोमवारी बिहारच्या कटियाल येथे प्रचारासाठी गेले होते. यावेळी त्यांनी मुस्लिम समुदायाला संबोधित केले. या मतदारसंघात मुस्लिम समुदायाची संख्या जास्त आहे. ‘मुस्लिम बंधुंची संख्या बिहारमध्ये सर्वाधिक आहे. अल्पसंख्याक असूनही बिहारमध्ये तुमची संख्या ६८ टक्के आहे. मी येथे तुम्हाला आवाहन देण्यासाठी आलो आहे. जर तुम्ही सगळे एकजुटीने एकत्र आले तर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाईट पद्धतीने पराभव होईल. तुम्ही जर पंजाबमध्ये आले तर पंजाबमध्येही तुम्हाला तितकच प्रेम मिळेल. कारण मी तिथे मंत्री आहे. तुम्ही सर्वजण एकत्र येऊन भाजप सरकारला उपटून टाका’, असे नवजोत सिंह सिद्धू म्हणाले. त्यांच्या या वक्तव्या संदर्भातील बातमी पाकिस्तानच्या ‘रेडीओ पाकिस्तान’ने प्रकाशित केली आहे.
याअगोदर क्रिकेट मॅच संदर्भात दिली होती सूचना
भारत आणि पाकिस्तानातील संबंध सुधारण्यासाठी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानदरम्यान क्रिकेट मॅच खेळण्याची सूचना केली होती. सिद्धूनं पाकिस्तान तहरीक-ए-इन्साफ (पीटीआय) च्या संसदेतील जावेदशी झालेल्या मुलाखतीमध्ये इंडियन प्रिमियर लीग (आयपीएल) आणि पाकिस्तान सुपर लीग (पीएसएल) च्या विजेत्यांमध्ये तीन मॅचेसची सिरीज करण्याची सूचना दिली होती. इस्लामाबादचे पंतप्रधान इमरान खानच्या शपथविधी सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर लाहोरला जाण्यापूर्वी सिद्धूनं ‘क्रिकेट पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांना एकत्र आणू शकतं. आयपीएल आणि पीएसएलच्या विजेत्या टीममध्ये मॅच खेळवणं हा चांगला विचार आहे,’ असं मत मांडलं होतं.