नेपाळमध्ये 22 प्रवशांना घेऊन निघालेल्या तारा एअरचं विमान बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. रविवारी सकाळी या विमानाने नेपाळूमधून उड्डाण केले मात्र अचानक या विमानाचा संपर्क तुटला आहे. दरम्यान विमानाशी कोणताही संपर्क होऊ न शकल्याने मोठी दुर्घटना झाल्याची भीती व्यक्त होतेय. दरम्यान या विमानातील 22 प्रवाश्यांमध्ये 4 भारतीय प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती समोर येतेय. या विमानाच्या शोधासाठी आता नेपाळ गृहमंत्रालयाने दोन खासगी हेलिकॉप्टर तैनात करण्यात आले आहेत. नेपाळ सैन्याकडूनही आता विमानाची शोध मोहिम सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तारा एअरच्या दुहेरी इंजिनच्या विमानाने आज सकाळी पोखराहून जोमसोमला उड्डाण केले. विमानाशी शेवटचा संपर्क सकाळी 9.55 वाजता झाला होता. विमान फक्त 15 मिनिटांच्या उड्डाणावर होते त्यात 22 प्रवासी प्रवास करत होते. तारा एअर कंपनी मुख्यत्वे कॅनडामध्ये बनवलेले ट्विन ऑटर विमान उडवते.
नेपाळमधील स्थानिक मीडियानुसार, बेपत्ता विमानात 4 भारतीय आणि 3 जपानी नागरिकांसह उर्वरित सर्व नेपाळी नागरिक होते. यात पायलट आणि विमानातील क्रू मेंमर्सचाही समावेश आहे, अशी माहिती स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिली आहे.
“We are deploying helicopter to the area for search operation,” Ram Kumar Dani, DSP of District Police Office, Mustang, told ANI
— ANI (@ANI) May 29, 2022
तारा एअरने दिलेल्या माहितीनुसार, कुमार त्रिपाठी, धनुष त्रिपाठी, रितिका त्रिपाठी आणि वैभवी बांदेकर अशी विमानातील चार भारतीयांची नावे आहेत. याशिवाय इंद्र बहादूर गोळे, पुरुषोत्तम गोळे, राजनकुमार गोळे, बसंत लामा, गणेश नारायण श्रेष्ठ, रवीना श्रेष्ठ, रश्मी श्रेष्ठ, रोजिना श्रेष्ठ, प्रकाश सुनुवर, मकर बहादूर तमांग, राममाया तमांग, सुकुमाया तमांग, तुलसी देवी तमांग, अश्मी देवी तमांग, डॉ. माईक ग्रीट, उवे विल्नर यांचाही समावेश आहे.
जोमसोम हा डोंगराळ भागात ट्रेकिंगसाठी येणाऱ्या परदेशी गिर्यारोहकांसाठी एक लोकप्रिय मार्ग आहे. येथील पूज्य मुक्तिनाथ मंदिराला मोठ्या संख्येने भारतीय आणि नेपाळी यात्रेकरू भेट देतात. नेपाळच्या गृह मंत्रालयाचे प्रवक्ते फदिंद्र मणि पोखरेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रालयाने बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी पोखरा येथून मुस्तांगपर्य़ंत दोन खाजगी हेलिकॉप्टर तैनात केले आहेत. शोधासाठी नेपाळ लष्कराचे हेलिकॉप्टर तैनात करण्याची तयारीही सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्य जिल्हा अधिकारी नेत्रा प्रसाद शर्मा यांनी एएनआयला सांगितले की, विमान मुस्तांग जिल्ह्यातील जोमसोमच्या आकाशात दिसले आणि नंतर धौलागिरी पर्वताकडे वळवले. तेव्हापासून संपर्क झाला नसल्याचे त्यांनी सांगितले.
2016 मध्ये ताराचे विमान बेपत्ता झाल्यानंतर भीषण अपघात झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, 23 प्रवाशांना घेऊन जाणारे बेपत्ता तारा विमान उत्तर नेपाळच्या डोंगराळ भागात कोसळले होते. या अपघातात सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. उड्डाणाची एकूण वेळ 19 मिनिटे होती, परंतु टेकऑफनंतर आठ मिनिटांनी विमानाचा संपर्क तुटला.