नवी दिल्ली : हिंडेनबर्गचा अहवालावरून जगातील प्रसिद्ध उद्योगपती गौतम अदानी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. यावरून देशातील राजकारणालाही वेग आला आहे. यावरून विरोधक आक्रमक झाले असून अदानी प्रकरणाबाबत केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसतर्फे येत्या 6 फेब्रुवारीला देशव्यापी आंदोलन करण्यात येणार आहे.
आपल्या जवळच्या मित्रांना पाठबळ देण्यासाठी सर्वसामान्यांचा पैसा केंद्र सरकार वापरत आहे. त्यामुळे काँग्रेस पक्षाने सोमवारी सर्व जिल्ह्यांतील आयुर्विमा महामंडळ कार्यालये आणि स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाखांसमोर आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी दिली. एलआयसी आणि एसबीआय यासारख्या सार्वजनिक क्षेत्रातील संस्थांचा संबंध अदानी समूहाशी आल्याने मध्यमवर्गीयांच्या बचतीवर लक्षणीय परिणाम होऊ शकतो, असे विरोधकांचे म्हणणे आहे.
#NewDelhi: #Congress decided to hold nationwide district level protests on Monday (Feb 6), in front of the Life Insurance Corporation office and the State Bank of India office over the Hindenburg report. pic.twitter.com/Uslvq5PpNy
— IANS (@ians_india) February 2, 2023
विरोधकांची मागणी धुडकावून सरकार निर्लज्जपणा दाखवेल, अशीच अपेक्षा आहे. परंतु पूर्ण शक्तीनिशी मोदी सरकारला घेरण्यासाठी संसदेच्या व्यासपीठाचा वापर आम्ही करू, असे केसी वेणुगोपाल यांनी सांगितले. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राष्ट३पती द्रौपदी मुर्मू यांचे अभिभाषण झाले तर, दुसऱ्या दिवशी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प मांडला. त्यानंतर तिसऱ्या दिवशी, गुरुवारी हिंडेनबर्गचा अहवालासंदर्भात संयुक्त संसदीय समितीमार्फत (JPC) किंवा सर्वोच्च न्यायालयाच्या निगराणीत चौकशी करण्याची मागणी विरोधी पक्षांनी लावून धरली.
अदानी समूहाच्या विरोधातील हिंडेनबर्ग अहवालावर केंद्रावर निशाणा साधत, संयुक्त विरोधी पक्षाने स्टॉक क्रॅशला ‘अमृतकाळातील महाघोटाळा’ म्हणून संबोधले आहे. याबाबत सरकारच्या मौनावर प्रश्नचिन्ह देखील विरोधकांनी उपस्थित केले. संसदेच्या दोन्ही सभागृहांचे कामकाज गुरुवारी दुपारी 2 वाजेपर्यंत तहकूब झाल्यानंतर विरोधकांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. हिंडेनबर्ग अहवालावर चर्चा करण्यासाठी विरोधकांनी स्थगन प्रस्ताव दिले होते. सभागृहांचे कामकाज स्थगित करून चर्चा घडविण्यास नकार दिल्याबद्दल विरोधकांनी सरकारवर टीका केली.