देवघर – रास्ता रोको केल्याप्रकरणी पोलिसांनी तब्बल २९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. धक्कादायक म्हणजे यामध्ये दोन मृतांचाही समावेश आहे. सारठ पोलिसांनी हा प्रकार केला असून ग्रामस्थांनी याविरोधात संताप व्यक्त केला आहे.
जरकाही (बंझेटा) गावातील सूफी जमाल यांच्या हत्येप्रकरणातील मुख्य आरोपीला अटक व्हावी याकरता गावकऱ्यांनी रास्ता रोको केला होता. मात्र, रास्ता रोको करून सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी २९ जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले. यापैकी १८ जण पीडित कुटुंबातील आहेत. तर, पोलिसांनी अशा दोघांवर गुन्हे दाखल केले ज्यांचा आधीच मृत्यू झाला आहे.
राजन मिया उर्फ रियाज पिता हबीस मिया यांचं १२ वर्षांपूर्वींच निधन झालं होतं. कब्रिस्तान येथे लावलेल्या कबरीजवळील बोर्डवरील तारखेनुसार त्यांचा मृत्यू ३१ जानेवारी २०१० साली झाला आहे. तर, निजामुद्दीन मियाँ उर्फ नसीम उर्फ गोदो मियां यांचा मृत्यू १ जुलै २०२२ रोजी झाली आहे. मात्र, या दोघांवर ११ सप्टेंबर २०२२ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कथित मृत आरोपींचा पोलीस गावत कसोशीने तपास घेत असल्याची माहितीही स्थानिकांनी दिली.
काय आहे प्रकरण?
४ जुलै २०२२ रोजी दुमजली इमारतीत झोपलेल्या सूफी जमाल यांची चाकू भोसकून हत्या करण्यात आली होती. याविरोधात मृताच्या वडिलांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. यानुसार, सिराज अंसारी आणि अन्य दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मात्र, पोलिसांनी त्यांना सोडून दिलं. दरम्यान, याच प्रकरणात एका लहान मुलीला अटक करण्यात आली. यामुळे मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त करत सिराज अंसारीला अटक करण्याची मागणी केली. एक लहान मुलगी हत्या कशी करू शकते, असा दावा करत मृताच्या नातेवाईकांनी खऱ्या मारेकऱ्याला पकडण्याची विनंती केली. पण पोलिसांनी त्यांचं काहीच ऐकलं नाही. त्यामुळे संतापलेल्या ग्रामस्थांनी ११ सप्टेंबर रोजी पोलीस ठाण्यासमोर चार तास रास्ता रोको आंदोलन केले. ग्रामस्थांचा विरोध पाहून पोलिसांनी मारेकऱ्याला अटक केली. मात्र, रास्ता रोको केल्याप्रकरणी २९ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. यामध्ये दोन मृतांचाही समावेश आहे.