कर्नाटकात विधानसभेच्या निवडणुकांचे वारे वाहू लागले आहेत. निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर काँग्रेसह भाजपही अलर्ट मोडवर आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष, माजी खासदार राहुल गांधी यांनी कर्नाटक विधानसभा प्रचारात महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी मोठी घोषणा केली.
उड्डपी आणि दक्षिण कर्नाटकमध्ये प्रचार करताना काँग्रेसने मोठी खेळी केली आहे. काँग्रेसची सत्ता आल्यास महिलांना राज्य सरकारची सार्वजनिक बससेवा ही मोफत केली जाईल, असे आश्वासन राहुल गांधी यांनी दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील निवडणुकीच्या वेळेस मतदारांना फक्त आश्वासनं दिली होती. परंतु ती आश्वासनं त्यांनी पाळली नाहीत, अशी टीका राहल गांधींनी मोदींवर केली.
आमचे सरकार आले तर आम्ही महिलांसाठी सार्वजनिक बससेवा मोफत करणार आहोत. गृहज्योती योजनेच्या माध्यमांतून महिन्याला दोनशे यूनिट मोफत वीज देण्यात येणार आहे, तर गृह लक्ष्मी योजनेत कुटुंबातील प्रमुख महिलेला दोन हजार रुपये, अन्न भाग्य योजनेत दारिद्र रेषेखालील कुटुंबातील प्रत्येक सदस्याला दरमहा १० किलो तांदूळ देण्यात येणार आहे. याशिवाय डिप्लोमा केलेल्या पण बेरोजगार असलेल्या युवकाला दोन वर्ष पंधराशे रुपये, तर बेरोजगार युवकांना तीन हजार रुपये मानधन देण्यात येणार असल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले.
गेल्या निवडणुकीत काँग्रेसने दिलेली चार आश्वासनं पाळीत नाहीत, असं पीएम नरेंद्र मोदी म्हणतात. परंतु आम्ही जी चार आश्वासानं दिली होती. त्यातील एक आश्वासन पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पूर्ण केलंय. आम्ही पहिल्याच मंत्रिमंडळाच्या बैठकीत पाच आश्वासनं पूर्ण केली आहेत, असं राहुल गांधी म्हणाले.