देशातील पश्चिमबंगाल, आसाम, केरळ, तामिळनाडू या चार राज्यांसह पद्दुचेरी या एका केंद्रशासित प्रदेशात विधानसभा निवडणूक पार पडत आहे. तामिळनाडू राज्यात येत्या ६ एप्रिल रोजी विधानसभा निवडणूक होणार असून या राज्यात निवडणूकीचा एकच टप्पा असणार आहे तर या निवडणुकीचा निकाल २ मे रोजी लागणार आहे. या पार्श्वभूमीवर तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकीचा जोरदार प्रचार सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तामिळनाडू दौऱ्यावर असून त्यांनी शुक्रवारी मदूराई येथील जनतेला संबोधित केले. यावेळी DMK-काँग्रेसनं थापा मारणं थोडं आवरावं, कारण जनता मूर्ख नाही, असे म्हणत पंतप्रधानांनी डीएमके आणि काँग्रेसवर चांगलाच निशाणा साधला.
असे म्हणाले मोदी…
डीएमके अर्थात द्रमुक आणि कॉंग्रेस पक्षाकडे बोलण्याचा खरा कोणताही अजेंडा, जाहीरनामा नाही, परंतु लोकं मूर्ख नाहीत म्हणून त्यांनी त्यांच्या खोट्या गोष्टींवर नियंत्रण ठेवले पाहिजे. कॉंग्रेस-द्रमुक स्वत:ला तामिळ संस्कृतीचा एकमेव संरक्षक म्हणून दाखवत आहे, परंतु वस्तुस्थिती वेगळीचं आहे, असे म्हणत डीएमके-कॉंग्रेसला मोदींनी लक्ष्य केले आहे.
यासह पंतप्रधान असेही म्हणाले, ‘कॉंग्रेस आणि द्रमुकने देवेंद्र कुला वेल्लर समुदायाचा मुद्दा अनेक दशकांपासून प्रलंबित ठेवण्याला प्राधान्य दिलं. तामिळनाडूमधील एआयएडीएमके सरकार आणि केंद्रातील भाजप नेतृत्व यांनी या समाजाचा मान राखण्यासाठी एकत्र काम केले. डीएमके आणि कॉंग्रेस आपल्यासाठी सुरक्षिततेची किंवा सन्मानाची हमी देत नाहीत. कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती त्यांच्या अधीन असेल.’
शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मदुराई येथून निवडणूक सभेत सहभागी होऊन प्रचार मोहीमेचा श्रीगणेशा केला. यावेळी नरेंद्र मोदींच्या प्रचारसभेत तामिळनाडूचे मुख्यमंत्री ई.के पलानीस्वामींसह इतर नेते मंडळी देखील उपस्थितीत होते. मदुराई येथे जनतेस संबोधित केल्यानंतर ते केरळ राज्याच्या दिशेने प्रवास करणार असून पथानामथिट्टामध्ये निवडणूक सभा घेणार आहेत. याव्यतिरिक्त संध्याकाळी ४ वाजता मोदी कन्याकुमारी येथे देखील प्रचारसभेत सहभागी होऊन जनतेला संबोधित करतील. यानंतर पुन्हा मोदी केरळला जाणार असून संध्याकाळी ६ वाजता तिरूअनंतपुरममध्ये देखील एका जनसभेला संबोधित करणार आहेत.