न्यूयॉर्क : रशिया आणि युक्रेन दरम्यान सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीय वेळेनुसार गुरुवारी रात्री उशिरा संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत (UNGA) एक ठराव मंजूर करण्यात आला. युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्यायसंगत आणि कायमस्वरुपी शांतता प्रस्थापित करण्यावर भर देणारा हा ठराव होता. तथापि, भारत आणि चीनसह 32 देशांनी या प्रक्रियेपासून दूर राहण्याची भूमिका घेतली.
संयुक्त राष्ट्रांच्या 193-सदस्यीय आमसभेत 141 सदस्यांनी प्रस्तावाच्या बाजूने मतदान केले तर सात सदस्यांनी विरोध केला. याशिवाय, चीन आणि भारतासह 32 सदस्य मतदानाला अनुपस्थित राहिले. आमसभेने एक बंधनकारक नसलेला ठराव मंजूर केला आहे. या ठरावात शत्रूत्व संपुष्टात आणून युक्रेनमधून सैन्य मागे घेण्याची आवाहन रशियाला करण्यात आले आहे. 24 फेब्रुवारी 2022 रोजी रशियाने युक्रेनवर आक्रमण केले. आज, शुक्रवारी या युद्धाला एक वर्ष पूर्ण झाले. या वर्षभरात, संयुक्त राष्ट्र आमसभा, सुरक्षा परिषद आणि मानवाधिकार परिषदेने युक्रेनवरील रशियन हल्ल्याचा वारंवार निषेध करून युक्रेनचे सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकता आणि प्रादेशिक अखंडतेची वचनबद्धतेवर भर दिला आहे.
Excerpts from PR @ruchirakamboj’s explanation of vote at the #UNGA Emergency Special Session on #Ukraine today. pic.twitter.com/tUptpHj09j
— India at UN, NY (@IndiaUNNewYork) February 24, 2023
सदस्य राष्ट्रे आणि आंतरराष्ट्रीय संघटनांना युक्रेनमध्ये सर्वसमावेशक, न्याय्य आणि चिरस्थायी शांतता प्रस्थापित करण्यासाठी राजनैतिक प्रयत्नांना आणखी पाठिंबा देण्याचे आवाहन या ठरावात करण्यात आले आहे. सागरी सीमेपर्यंत विस्तारलेल्या आपल्या देशाच्या सार्वभौमत्व, स्वातंत्र्य, एकता आणि प्रादेशिक अखंडतेसाठी कटिबद्ध असल्याचे युक्रेनने म्हटले आहे. रशियाने शक्य तितक्या लवकर आणि बिनशर्त आपले सर्व सैन्य युक्रेनच्या भूभागातून माघारी घ्यावे आणि त्यांना शत्रूत्व थांबविण्याचे आवाहन करावे, या मागणीचा युक्रेनने पुनरुच्चार केला.
युक्रेनच्या स्थितीबाबत भारताला चिंता – रुचिरा कंबोज
भारत युक्रेनमधील परिस्थितीबद्दल चिंतित आहे. संघर्षामुळे असंख्य लोकांचे बळी गेले आहेत. लाखो लोक बेघर झाले. हे ध्यानी घेता, आपण दोन्ही बाजूंना मान्य असलेल्या संभाव्य तोडग्याच्या जवळ आहोत का? दोन्ही बाजूंचा समावेश नसलेली कोणतीही प्रक्रिया विश्वासार्ह तोडगा काढू शकते का? 1945मध्ये अस्तित्वात आलेले संयुक्त राष्ट्र तसेच संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) जागतिक शांतता आणि सुरक्षिततेसंबंधीच्या समकालीन आव्हानांना तोंड देण्यासाठी कुचकामी ठरली आहे का? हे प्रश्न आपणच स्वत:ला विचारले पाहिजेत, असे संयुक्त राष्ट्रातील भारताच्या राजदूत रुचिरा कंबोज म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्रांच्या तत्त्वांचे भारत पालन करतो. कोणत्याही वाद किंवा संघर्ष टाळण्यासाठी आम्ही नेहमीच संवाद आणि मुत्सद्देगिरी हा एकमेव मार्ग मानतो. चिरस्थायी शांतता साध्य करण्याच्या दृष्टीने या ठरावात नमूद केलेली उद्दिष्टे लक्षात घेतो. मात्र ते साध्य करण्याच्या मर्यादा लक्षात घेता, त्यापासून दूर राहण्याशिवाय पर्याय नाही, असे भारताने स्पष्ट केले.