देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाची आज पत्रकार परिषद पार पडले. यामध्ये आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल म्हणाले की, ‘महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली, तमिळनाडू, कर्नाटक, उत्तर प्रदेश, केरळ आणि गुजरातमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने वाढत आहे. त्यामुळे देशात चिंता वाढली आहे.’ ओमिक्रॉन व्हेरिएंटच्या अनुषंगाने आरोग्य मंत्रालयाकडून दिलासादायक गोष्टी सांगण्यात आल्या. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, ‘जगभरात ओमिक्रॉनमुळे ११५ लोकांचा मृत्यू झाला आहे. तर भारतात आतापर्यंत एकाच व्यक्तीचा मृत्यू ओमिक्रॉनमुळे झाला आहे.’
यादरम्यान आरोग्य मंत्रालयाने कोरोना आढाव्यानंतर रुग्णांना डिस्चार्ज देण्याचा प्रोटोकॉल बदलला आहे. आता हलके लक्षण असलेले रुग्ण पॉझिटिव्ह आल्याच्या सात दिवसांनंतर डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. यादरम्यान जर सलग तीन दिवस रुग्णांची स्थिती ठिक असेल आणि ताप नसेल तर डिस्चार्जसाठी चाचणी करण्याची गरज नाही.
तसेच मध्यम लक्षण असलेल्या रुग्णांमध्ये सुधारणा दिसतात आणि त्यांचे ऑक्सिजन सॅच्युरेशन स्तर ऑक्सिजन सपोर्टशिवाय सलन तीन दिवसांपर्यंत ९३ टक्क्यांहून जास्त असेल तर अशा रुग्णांचा डिस्चार्ज दिला जाऊ शकतो.
देशातील चार राज्यांमध्ये चिंताजनक परिस्थिती आहे. या राज्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट सर्वाधिक आहे. यामध्ये महाराष्ट्र, पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेश समावेश आहे. महाराष्ट्रात २२.३९ टक्के, पश्चिम बंगालमध्ये ३२.१८ टक्के, दिल्लीत २३.१ टक्के आणि उत्तर प्रदेशमध्ये ४.४७ टक्के कोरोना पॉझिटिव्हिटी रेटची नोंद झाली आहे, अशी माहिती आरोग्य मंत्रालयाने दिली आहे.
हेही वाचा – Maharashtra School: राज्यातील शाळा आणखीन १५ ते २० दिवस बंद राहणार; राजेश टोपेंची माहिती