देशाची राजधानी दिल्लीसह अनेक राज्यांमध्ये सध्या हवामान स्वच्छ आहे. पण मागील दिवसांच्या तुलनेत तापमानात वाढ झाली आहे. यात हवामान खात्याने देशातील हवामान पुन्हा बिघडणार असल्याचे संकेत दिले आहेत. यामुळे दिल्लीसह अनेक राज्यांत अवकाळी पावसाला सुरुवात होणार आहे. तर पर्वतीय राज्यांमध्ये बर्फवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाच्या माहितीनुसार, येत्या काही दिवसांत उत्तर प्रदेश, राजस्थान, दिल्ली आणि हरियाणासह अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा तापमानात घट होण्यासोबतच थंडी वाढण्याची शक्यता आहे. यामुळे राजधानी दिल्लीतील हवामान पुन्हा खराब होऊ शकते. मंगळवार आणि त्यापुढील दोन ते तीन दिवस हवामान खराब राहणार असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे. तर पहाडी भागात बर्फवृष्टी सुरु राहणार आहे. आजपासून उत्तराखंडमध्ये हलका पाऊसासह हिमवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
या हवामान बदलांमुळे राजधानी दिल्लीतील किमान तापमान 8.8 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आल्याने सोमवारी दिल्लीकरांची सकाळ सुखद होती. हवामान खात्याने दिवसभर मुख्यतः आकाश निरभ्र राहण्याचा अंदाज वर्तवला असून कमाल तापमान 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहण्याची शक्यता आहे. यासोबतच बुधवारीही आकाश ढगाळ राहून हलका पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
रविवारी राष्ट्रीय राजधानीत कमाल तापमान 24.2 अंश सेल्सिअस नोंदले गेले, जे सामान्यपेक्षा एक अंश जास्त आणि किमान तापमान 5.4 अंश सेल्सिअस नोंदवले गेले, जे सामान्यपेक्षा चार अंशांनी कमी होते.
दिल्लीतील हवेची गुणवत्ता दिवसेंदिवस खराब श्रेणीत नोंदवली जातेय. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार, सकाळी 9 वाजता हवा गुणवत्ता निर्देशांक (AQI) 262 नोंदवला गेला. याबरोबर फरिदाबाद (289), गाझियाबाद (316), ग्रेटर नोएडा (217), गुडगाव (244) आणि नोएडा (219) येथे AQI नोंदवले गेले.