पश्चिम बंगालचा होतोय महाराष्ट्र ! तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या वाटेवर ?
महिन्याभरापूर्वी शिवसेनेचे एकनाथ शिंदे यांनी मविआ सरकारविरोधात केलेल्या बंडामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा विस्फोट झाला. उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळले आणि शिंदेगटाने भाजपसोबत राज्यात सत्ता स्थापन केली. आता हाच कित्ता भाजप पश्चिम बंगालमध्येही गिरवत आहे. तृणमूलचे ३८ आमदार भाजपच्या गळाला लागले असून लवकरच ते भाजपवासी होणार आहेत. असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांनी केला आहे.
सध्या पश्चिम बंगालमध्ये शिक्षक भरती घोटाळ्यावरून वातावरण चांगलेच तापले आहे. या घोटाळ्याप्रकरणी तृणमूलचे मंत्री पार्थ चटर्जी यांना अटक झाली असून त्यांच्या निकटवर्तीय अर्पिता मुखर्जी यांच्या घरात २१ कोटी रुपयांची रोख रक्कम सापडल्याने त्यांच्यावरही ईडीने कारवाई केली आहे. यामुळे तृणमूलचे नेतेही अस्वस्थ झाले आहेत. याचदरम्यान, भाजप प्रदेश कार्यालयात पत्रकारांशी बोलताना मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपचे ३८ आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा बॉम्ब फोडला. तसेच या ३८ मधील २१ जण थेट आपल्याच संपर्कात असल्याचे सांगताना मिथुन चक्रवर्ती यांनी जर बंगालमध्ये निष्पक्ष निवडणुका झाल्या तर भाजपचीत सत्ता येणार असा दावाही केला. मिथुन यांच्या या दाव्यामुळे पश्चिम बंगालच्या राजकीय वर्तुळात महाराष्ट्रासारखीच आपली परिस्थिती तर होणार नाही ना अशी चर्चा सुरू झाली आहे.
#WATCH | West Bengal: Do you want to hear breaking news? At this moment, 38 TMC MLAs have very good relations with us, out of which 21 are in direct (contact with us): BJP leader Mithun Chakraborty in Kolkata pic.twitter.com/1AI7kB4H5I
— ANI (@ANI) July 27, 2022
पत्रकारांशी बोलताना मिथुन यांनी थेट तृणमूलवरच निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की गेल्या वर्षी सत्ताधारी पक्षाने बळजबरीने विजय मिळवत सत्ता मिळवली. तसेच शिक्षक भरती घोटाळाप्रकरणीही यावेळी त्यांनी विधान केले. ते म्हणाले की ज्याने गुन्हा केला असेल तर त्याला शिक्षा होणारच. पुरावे मिळाल्यावर कायद्यापासून कोणालाही पळता येणार असेही यावेळी ते म्हणाले. गेल्या वर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकांनंतर मिथुन चक्रवर्ती तब्बल एक वर्ष राजकारणापासून दूर होते. मात्र आता ते पुन्हा राजकारणात सक्रीय झाले असून महिन्याभरात ते दुसऱ्यांदा प्रदेश भाजप कार्यालयात आले. यावेळी त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी त्यांनी सर्वप्रथम जनसंघाचे संस्थापक डॉक्टर श्यामा प्रसाद मुखर्जी आणि भाजपचे संस्थापक सदस्य दीनदयाल उपाध्याय यांच्या फोटोला पुष्पहार अर्पण करत श्रद्धांजली वाहिली. त्यानंतर त्यांनी भाजपच्या आमदार आणि ज्येष्ठ नेत्यांबरोबर बैठकही घेतली.
गेल्या वर्षी मार्चमध्ये विधानसभा निवडणुकांच्या काही दिवसांआधीच एका महारॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मिथुन चक्रवर्ती यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यांनी कुठलीही निवडणुक लढवली नसली तर भाजपचा प्रचार करण्यात मात्र ते सतत पुढे होते. पण त्यानंतर मात्र ते राजकारणापासून दूर झाले. पण ४ जुलै रोजी त्यांनी प्रकृती अस्वास्थामुळे राजकारणापासून लांब होतो असे सांगितले . तसेच वंचितांसाठी काम करण्याची इच्छा असून पक्षाने माझ्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करणार असल्याचेही यावेळी ते म्हणाले.