घरसंपादकीयदिन विशेषकायदे पंडित, समाजसुधारक नारायण चंदावरकर

कायदे पंडित, समाजसुधारक नारायण चंदावरकर

Subscribe

नारायण गणेश चंदावरकर हे कायदे पंडित आणि समाजसुधारक होते. त्यांचा जन्म २ डिसेंबर १८५५ रोजी होनावर (उत्तर कॅनरा) या ठिकाणी झाला. त्यांचे बहुतेक शिक्षण मुंबईला एल्फिन्स्टनमध्ये झाले. इंग्रजी विषय चंदावरकरांच्या आवडीचा होता. प्रोफेसर वर्ड्सवर्थ यांच्या इंग्रजी अध्यापनाचा त्यांना लाभ झाला. इतिहास, तत्त्वज्ञान व अर्थशास्त्र हे विषय अभ्यासून ते बी.ए.ला प्रथम वर्गात उत्तीर्ण झाले (१८७६). त्यांना महाविद्यालयात ‘फेलो’ म्हणून नेमण्यात आले.

दोन वर्षांनी न्या. तेलंग यांच्या शिफारशीवरून ‘इंदुप्रकाश’ या द्वैभाषिक साप्ताहिकाच्या इंग्रजी विभागाचे ते संपादक झाले. त्यांनी अत्यंत आत्मीयतेने काम करत दहा वर्षांत त्या साप्ताहिकाची लोकप्रियता, तसेच त्याचा खप वाढविला. ‘इंदुप्रकाश’ साप्ताहिकातून ते स्त्रियांना उच्च शिक्षण देण्याचा पुरस्कार करीत होते. स्त्रिया व मागासवर्गाला राजकीय हक्क पाहिजेत असे मत ते मांडीत. सार्वजनिक जीवनातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींशी न्या. रानडे यांच्याप्रमाणेच न्या.चंदावरकरांचा संबंध होता. शासकीय बंधने पाळूनही लोकहित साधता येते, याचा एक आदर्श त्यांनी निर्माण केला. अस्पृश्यता निवारण कार्यात त्यांना रस होता. कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे यांनी स्थापन केलेल्या डिप्रेस्ड क्लास मिशनचे चंदावरकर अनेक वर्षे अध्यक्ष होते.

- Advertisement -

‘नीच मानलेल्या लोकांना वर आणण्याचा प्रयत्न करण्याने आम्ही स्वत:ला वर आणीत आहोत. हे पवित्र कार्य करीत असताना या लोकांचा आम्ही उद्धार करणार हा घमेंडीचा विचार आमच्या अंत:करणात न शिरो आणि आम्हा सर्वांना या घोर अन्यायामुळे जी अधोगती मिळाली आहे, ती टळून सर्वांचा सारखाच उद्धार होणार आहे, असा साधा आणि सात्त्विक भाव आम्हांमध्ये निरंतर जागृत राहो,’ अशी चंदावरकर यांची दलितोद्धाराबाबतची भूमिका होती. सामाजिक, धार्मिक, राजकीय आणि आर्थिक चळवळी व प्रश्नांमध्ये न्या. चंदावरकर, न्या. रानडे, न्या. तेलंग यांचा सहभाग असे.अशा या महान समाजसुधारकाचे ४ मे १९२३ रोजी निधन झाले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -