घरफिचर्ससारांशशेती, शेतकरी आणि आयकर कायदा...

शेती, शेतकरी आणि आयकर कायदा…

Subscribe

शेती व्यवसाय हा निसर्गावर अवलंबून आहे. ह्या व्यवसायासमोर अनेक आव्हानेसुद्धा आहेत. नेत्यांचे शेतीपासून असणारे कोटीच्या कोटी उत्पन्न हे नेहमीच चर्चेचा विषय बनले आहे. अनेक आव्हाने असताना नेते मंडळी एवढे मोठे शेती उत्पादन कसे घेतात यावर सोशल मीडियावर शेती कशी करावी हे नेत्यांकडून शिकावे असे विनोद अनेकदा आपण ऐकतो. शेती उत्पन्नला आयकर नाही, शेती विक्री करून येणार्‍या रकमेवर आयकर आहे की नाही असे अनेक प्रश्न शेतकरी वर्गासमोर आहेत. ह्या विषयावर हा प्रकाशझोत..

शेती उत्पन्नावर आयकर आहे का ?

फक्त शेतीचे उत्पन्न एखाद्या व्यक्तीला आहे आणि त्याला दुसरे कुठलेही उत्पन्न नाही तर त्याला आयकर भरावा लागत नाही. परंतु शेती उत्पन्नासोबत त्याला इतरही उत्पन्न असेल तर शेती उत्पन्न आणि इतर उत्त्पन्न हे दोन्ही एकत्र करून त्यावर आयकर भरावा लागतो. म्हणजेच शेती उत्पन्नासोबत इतर करपात्र उत्पन्न असेल तर शेती उत्पन्नावरसुद्धा आयकर भरावा लागतो. एखादी पगारदार व्यक्ती किंवा व्यावसायिक व्यक्ती आहे त्याला पगाराचे किंवा व्यवसायाचे उत्पन्न आहे व त्याला शेतीपासून सुद्धा उत्पन्न आहे तर त्याला पगार, व्यवसाय उत्पन्न व शेती हे सर्व उत्पन्न एकत्र करून त्यावर आयकर भरावा लागतो. म्हणजेच फक्त शेती उत्पन्न असेल तरच ते आयकर मुक्त आहे. इतर उत्प्प्नन व शेती उत्पन्न असे एकत्रित उत्पन्नावर आयकर कसा काढायचा याची वेगळी पद्धतसुद्धा आयकर कायद्यात दिलेली आहे.

- Advertisement -

शेती विक्री केली तर त्या येणार्‍या रकमेवर आयकर भरावा लागेल काय ?

आयकर कायद्यात शहरी भागातील शेती आणि ग्रामीण भागातील शेती असे दोन प्रकार केले आहे. कोणत्या शेतीला ग्रामीण शेती म्हणावी व कोणत्या शेतीला शहरी शेती म्हणावी याची व्याख्यासुद्धा आयकर कायद्यात दिलेली आहे. जर शहरी भागातील शेती विकली तर येणार्‍या रकमेवर आयकर भरावा लागतो. जर ग्रामीण शेती विकली तर त्यावर आयकर भरावा लागत नाही. पण शहरी भागातील शेती विकून येणार्‍या पैशातून जर ग्रामीण भागात शेती विकत घेतली तर आयकर भरावा लागत नाही.

- Advertisement -

शेती विक्री करताना एक महत्वाची काळजी घेणे गरजेचे आहे. अनेक ठिकाणी शेतीचे सरकारी मूल्यांकन हे कमी आहे व शेतीचे भाव किंवा मार्केट किंमत जास्त आहे. शेतकरी सरकारी मूल्याकंनानुसार खरेदीचे दस्त किंवा खरेदी खत करतात व बाकी रक्कम रोख स्वरूपात घेतेता व ती रक्कम बँकेमध्ये भरतात व ही रक्कम मोठी असते. शेती विक्री करून आलेल्या रकमेवर आयकर नाही ह्या गैरसमजुतीतून अशी रक्कम बँक खात्यात भरली जाते, परंतु तुमचे खरेदी खतामध्ये ज्या रकमेचा विक्री व्यवहार दाखवलेला आहे तीच रक्कम हे तुमचे शेती विक्रीचे उत्पन्न धरले जाते. बँक खात्यात तुम्ही त्या व्यतिरिक्त रक्कम भरली असेल जरी ती शेती विक्रीची असेल तर त्यावर आयकर भरावा लागतो.

तुमच्या बँक खात्यात मोठ्या प्रमाणात रक्कम भरली असेल किंवा बँक खात्यातून रक्कम काढली असेल तर असे व्यवहार आयकर खात्याला कळविणे बँकांवर बंधनकारक आहे. तसेच शेती खरेदी विक्रीचे दस्त जिथे नोंदविले जातात त्या नोंदणी कार्यालयालासुद्धा असे व्यवहार आयकर खात्याला कळविणे बंधनकारक आहे. त्यामुळे आता खरेदी-विक्री व्यवहाराची माहिती ही सहजपणे आयकर खात्याकडे उपलब्ध असते. तसेच ग्रामीण शेती विक्रीकरून आलेली रक्कम जरी आयकर मुक्त असेल आणि आलेली रक्कम तुम्ही बँकेत मुदत ठेवीमध्ये ठेवली असेल तर त्यावर येणार्‍या व्याजावर आयकर भरावा लागेल. तसेच शेती विक्री करून येणार्‍या रकमेतून गाळा (शॉप) घेतले आहे व त्या शॉपचे भाडे येत आहे तर त्यावरसुद्धा आयकर भरावा लागेल.

शेती उत्पन्नातून घर घेतले आणि मी ते विकले तर त्यावर आयकर भरावा लागेल काय ?

शेती उत्पन्नातून घर घेतले आणि ते विकले आणि त्या येणार्‍या रकमेतून दुसरे घर घेतले तर आयकर भरावा लागणार नाही. जर दुसरे घर घेतले नाही तर आयकर भरावा लागेल.
सरकारने शेती रस्ता किंवा इतर प्रोजेक्टसाठी अधिग्रहित केली तर त्याचा मिळालेल्या मोबदल्यावर आयकर भरावा लागेल का?
जर ग्रामीण शेती अधिग्रहित केली तर त्यावर आयकर भरावा लागणार नाही, पण शहरी शेती अधिग्रहित केली तर कर भरावा लागेल.

ग्रामीण शेती आहे ती बिनशेती करून विक्री केली तर त्यावर आयकर भरावा लागेल का ?
ग्रामीण शेती ही बिनशेती करून विक्री केली तर त्यावर आयकर भरावा लागेल.

– फक्त शेती उत्पन्न पूर्ण करमुक्त आहे, परंतु त्यासाठी शेतकर्‍याने काही कागदपत्रे ठेवावी लागतात काय ?

जसे वर आपण बघितले की फक्त शेती उत्पन्न हे आयकर मुक्त आहे तरीही जे मोठे शेतकरी आहेत, ज्यांची शेती जास्त प्रमाणात लागवडीखाली आहे व उत्पन्नसुद्धा जास्त आहे त्यांनी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. मोठे शेतकरी जे आहेत ज्यांचे द्राक्ष, ऊस, डाळींब व इतरही शेती उत्पन्न आहे त्यांनी रोख व्यवहार करताना काळजी घेणे गरजेचे आहे. जमिनीच्या सातबारा वर घेण्यात येणार्‍या पिकांची नोंद करणे आवश्यक आहे. शेतीमाल विक्रीची बिले घेणे व विक्रीचे पैसे चेक किंवा आरटीजीएसने घ्यावे. तसेच लागवड खर्चात मजुरी हा मोठा खर्च आहे. मजुरांच्या चेकने किंवा बँक खात्यात वर्ग करावा, कीटकनाशके, बी बियाणे ह्या खर्चाचेसुद्धा बिले घेणे आवश्यक आहे. रोख खर्च शक्यतो टाळावे. बँक खात्यात रोख रक्कम भरणे किंवा काढणे असे व्यवहार हे आयकर खात्याकडे आता सहजतेने उपलब्ध होत आहेत. त्यामुळे असे रोख व्यवहार टाळावे, नाहीतर विनाकारण आयकर चौकशीला सामोरे जावे लागते.

जसे सुरवातीलाच सांगितले की, शेती उत्पन्न दाखवून अनेकजण आयकर चोरी करतात, परंतु आयकर खातेसुद्धा आता खूप सजग झाले आहे. किती एकर जागेतून कुठल्या पिकापासून किती उत्पन्न येते, लागवड खर्च किती येतो ह्याचा काही सर्व्हेसुद्धा आयकर खात्याने केलेला आहे, त्यामुळे शेती उत्पन्न आयकर विवरण पत्रामध्ये दाखवताना आयकर दात्याने विशेष काळजी घेणे गरजेचे आहे.

फक्त शेती उत्पन्न आहे तरी त्या शेतकर्‍याने आयकर विवरण पत्र ( रिटर्न) भरणे गरजेचे आहे का ?

ज्यांना फक्त शेती उत्पन्न आहे, त्यांनी आयकर विवरण पत्र दाखल करणे बंधनकारक नाही, परंतु आयकर खात्याला तुमच्या पॅन नंबरवरून खूप सारी माहिती विनासायास उपलब्ध होत असते. जसे की, बँकेत मोठ्या रकमेच्या मुदत ठेवी करणे व त्यावर मिळणारे व्याज, जमिनीची खरेदी विक्री, मोठ्या प्रमाणात खर्च केलेले विदेश दौरे, शेती उत्पन्नातून शेअर्स व म्युचल फंड खरेदी करणे, मोठ्या किमतीच्या कार खरेदी करणे, गाळा किंवा शॉप खरेदी करणे असे मोठे व्यवहार असतील तर आयकर विवरण पत्र दाखल करून त्यात ते दाखविणे हे केव्हाही चांगले आहे. वरील मोठे व्यवहार असतील तर आयकर विवरण पत्र दाखल करून नंतर येणारी आयकर चौकशी टाळता येते.

शेती संबंधित लोकांनी शेतीला आयकर नाही अशी समजूत करून घेऊ नये व योग्य ती काळजी घ्यावी. आयकर चौकशी नोटिसा ह्या नेहमी आर्थिक वर्ष संपून गेल्यानंतर येतात व नंतर काही आयकर भरावयास लागला तर त्यावर दंड व व्याजसुद्धा भरावे लागते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -