घरफिचर्ससारांशस्वतंत्र प्राणीराष्ट्राचा फियास्को!

स्वतंत्र प्राणीराष्ट्राचा फियास्को!

Subscribe

बहुतांश प्राण्यांना वास्तवाची जाणीव होत आहे ही बाब ह्या धूर्त प्राण्यांच्या नेत्यांच्या लक्षात येते. हे धूर्त नेते मग जे प्राणी ह्या सत्य परिस्थितीविरुद्ध आवाज उठवतात ते कसे राष्ट्रद्रोही विचाराचे आहेत, ते कसे स्वतंत्र प्राणीराष्ट्र स्थापन होऊ द्यायचे नाही ह्यासाठी देशविरोधी कारवाया करतात, हे खोटेनाटे बोलून सतत प्राण्यांना पटवून देण्याचे काम करायला लागतात. वेळ आली तर एकवेळ उपाशी राहू, आपल्या सुराज्यासाठी त्याग करू, पण ध्येय साध्य करू, अशीही फुकाची आवाहने ही नेते मंडळी करतात. बरेच जण ह्या अपप्रचाराला सहज बळी पडतात. कारण त्यांना ते अवास्तव कल्पनेतील जग हे सत्यात येईल असे सतत वाटत असते.

– प्रशांत कळवणकर

प्रसिद्ध लेखक जॉर्ज ऑरवेल यांनी ‘अ‍ॅनिमल फार्म’ नावाचे एक पुस्तक लिहिले आहे. ह्या पुस्तकातील कथा एका वेगळ्या कल्पनेवर आधारित आहेत. पूर्ण कथानकाचा हा अनुवाद जरी नसला तरी कथा काहीशी मिळती जुळती आहे.

- Advertisement -

प्रस्तुत कथेत एक गर्भश्रीमंत परंतु एक व्यसनी शेतकरी असतो. त्याच्याकडे असंख्य जनावरे जसे बैल, गाई, शेळ्या, मेंढ्या, गाढवे, डुकरे व इतर प्राणी असतात. हा शेतकरी व्यसनी असल्यामुळे प्राण्यांना दिवसातून दोन वेळेस परंतु वेळेवर जेवण देत नसे. एक दिवस काही प्राणी आपण आपले प्राण्यांचे राज्य स्थापन करावे आणि ह्या शेतकर्‍याच्या तावडीतून मुक्त व्हावे हा विचार मांडतात. काही प्राणी माणसापेक्षा बहुतांश गोष्टीत आपण असमर्थ आहोत ह्या भीतीने ह्या स्वातंत्र्याच्या कल्पनेला विरोध करतात, पण ह्या प्राण्यांमधील काही धूर्त प्राणी त्यांना विविध खोटी प्रलोभने आणि आश्वासने देऊन आभासी देशप्रेम जागवतात. सतत अवास्तव काल्पनिक जगतात ठेवण्यासाठी ते वेळप्रसंगी खोटे बोलून प्राण्यांची दिशाभूल करतात. त्यामुळे ह्या प्राण्यांना ही काल्पनिक परंतु अवास्तव स्वतंत्र जगाची कल्पना हळूहळू वास्तव वाटायला लागते.

प्राण्यांचे हे धूर्त नेते स्वतःच्या स्वार्थापायी व सर्व सत्तासूत्रे आपल्या हाती राहावी म्हणून ही अवास्तव जगाची कल्पना प्राण्यांमध्ये प्रभावीपणे रूजवतात. त्यासाठी हे नेते एक स्वातंत्र्य गीतसुद्धा तयार करतात. हळूहळू हा उन्माद सर्व प्राणीमात्रात पसरतो आणि एक दिवस हे सर्व प्राणी त्यांच्या अन्नदात्या शेतकर्‍याची हत्या करतात.

- Advertisement -

सर्व प्राणी आता आनंदी होत माणसापेक्षा आपण श्रेष्ठ आहोत ह्या भावविश्वात जगत त्या अवास्तव काल्पनिक जगाची स्वप्ने पाहू लागतात. काही दिवस आनंदात जातात, परंतु मनुष्यापेक्षा आपण श्रेष्ठ नाहीत याची जाणीव काही जणांना व्हायला लागते. आधी वेळेवर जरी नाही तरी दोन वेळचे अन्न ह्या प्राण्यांना मिळत होते. आता मात्र त्यांना एकवेळचे अन्न कसेबसे मिळू लागले.

बहुतांश प्राण्यांना वास्तवाची जाणीव होत आहे ही बाब ह्या धूर्त प्राण्यांच्या नेत्यांच्या लक्षात येते. हे धूर्त नेते मग जे प्राणी ह्या सत्य परिस्थितीविरुद्ध आवाज उठवतात ते कसे राष्ट्रद्रोही विचाराचे आहेत, ते कसे स्वतंत्र प्राणीराष्ट्र स्थापन होऊ द्यायचे नाही ह्यासाठी देशविरोधी कारवाया करतात, हे खोटेनाटे बोलून सतत प्राण्यांना पटवून देण्याचे काम करायला लागतात. वेळ आली तर एकवेळ उपाशी राहू, आपल्या सुराज्यासाठी त्याग करू, पण ध्येय साध्य करू, अशीही फुकाची आवाहने ही नेतेमंडळी करतात. बरेच जण ह्या अपप्रचाराला सहज बळी पडतात. कारण त्यांना ते अवास्तव कल्पनेतील जग हे सत्यात येईल असे सतत वाटत असते.

हळूहळू योग्य प्रशासनाच्या अभावामुळे त्यांची उपासमार व्हायला लागते. अनेक गोष्टींचा तुटवडा भासायला लागतो. ते हे सर्व सहन करतात. कारण त्यांच्यावर स्वतंत्र प्राणी जगताची कल्पना धूर्त नेत्यांकडून प्रखरपणे बिंबवली जात असते. चांगले दिवस येतील ह्या नेत्यांच्या खोटारड्या आश्वासनामुळे ते विरोध करणार्‍या लोकांची हेटाळणी करायला लागतात व स्वतंत्र प्राणीराष्ट्रासाठी आपण हे हाल सहन करून खरी देशसेवा करीत आहोत, ह्या फाजील भ्रमात राहणे पसंत करतात.

आणखी काही दिवस जातात. ह्या प्राण्यांची परिस्थिती चांगली होण्याऐवजी आणखीनच हलाखीची बनत जाते. अनेक प्राण्यांची उपासमार होते. विविध आजार-रोगराईमुळे व त्यावरील उपचाराच्या अभावामुळे अनेक प्राणी मृत्युमुखी पडतात. प्राणिसंख्या हळूहळू कमी होऊ लागते. स्वतंत्र प्राणीराष्ट्राचा फुगा सरतेशेवटी फुटतो. सर्व प्राण्यांना पश्चाताप होऊ लागतो, परंतु आता वेळ गेलेली असते. केवळ मृत्यूची वाट पाहणे एवढेच नशिबी शिल्लक राहिलेले असते. वास्तवाचे भान ठेवून कल्पनेच्या भावविश्वातून योग्य वेळी बाहेर न आल्यास व सत्य-असत्य यातील भेद लक्षात घेण्याचा प्रयत्न न केल्यास केवळ आपण आपलेच नव्हे तर येणार्‍या पिढ्यांचेही नुकसान करतो हेच ह्या कथानकातून सिद्ध होते.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -