घरफिचर्ससारांशनिसर्गाची कचराकुंडी बनवणारे नियोजित अप्रचलन!

निसर्गाची कचराकुंडी बनवणारे नियोजित अप्रचलन!

Subscribe

नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामुळेच ‘वापरा आणि फेका’ नावाचा भस्मासूर जन्माला आला. त्यामुळे सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रूपांतर व्हायला लागले. कपडे विटले, फेकून द्या. शूज उसवले, फेकून द्या. लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या. दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आली आहे. उत्पादनांचा दर्जा घसरूनही पैसे कमावता येतात हे नवे गुपित उद्योग जगताला कळाले आहे. अशा कंपन्यांना फिबस कार्टेल म्हटले जाते. त्यांच्या या क्लृप्तीला प्लॅन्ड ओबसोलेसेंस म्हणतात. खरंतर हा सापळा आहे. मराठीत याला नियोजित अप्रचलन असे म्हणता येईल. या माध्यमातून एखादी वस्तू लवकर कालबाह्य करून ग्राहकाला त्या जागी नवी वस्तू खरेदी करायला भाग पाडले जाते.

– राम डावरे

माझी कार ९ वर्षे जुनी झाली आहे आणि माझे मित्र मला रोज टोमणे मारत आहेत की, आता तू कार बदलायला हवी. मार्केटमध्ये किती छान छान नवीन कार आल्या आहेत. होमो शेपियन्स ह्या पुस्तकाचा लेखक युवाल नोव्हा हरारी त्याच्या पुस्तकात एक वाक्य वापरतो. येणार्‍या काळात मानव आणि कोंबडा हे दोघेही सारखेच असतील. त्याच्या हातात काहीही राहणार नाही. सर्व जग इंटरनेट ऑफ थिंग्सच्या आहारी जाणार आहे. आज आपण सोशल मीडियावरील जाहिराती आणि ट्रेंडच्या जगात आपल्या हातात काहीही नाही याची प्रचिती घेत आहोत. कसं ते जाणून घेऊया.

- Advertisement -

जानेवारी १९२५ मध्ये स्वित्झर्लंडच्या जिनिव्हा या शहरामध्ये एका खास उद्योगसमूहाने काही खास लोकांसाठी एक गुप्त मीटिंग आयोजित केली होती. विजेवर चालणारे प्रकाशदिवे (बल्ब) बनवणारे सर्व आघाडीच्या सर्व उत्पादकांना त्या मीटिंगमध्ये बोलावले गेले होते. बल्बचा शोध लागून एव्हाना ९० वर्षे झाली होती. सुरुवातीच्या काळातले बल्ब अत्यंत निकृष्ट दर्जाचे आणि अल्पायुषी होते, पण वर्षागणिक सुधारणा होत गेल्या. १९२० पर्यंत तब्बल अडीच हजार तासांचे आयुष्यमान असणारे दर्जेदार आणि दीर्घायुषी बल्ब बाजारात उपलब्ध व्हायला लागले होते. जनता बल्बवर खूश होती, पण कोणाला तरी बल्बचे इतके दीर्घजीवी असणे खटकत होते. ते कोण होते?

साक्षात बल्ब उत्पादक! कारण त्यांना वाटत होते की प्रत्येक आवृत्तीनंतर बल्बचे आयुष्य वाढत जाणे हे त्यांच्या धंद्याच्या दृष्टीने धोक्याचे आहे. जिनिव्हाच्या त्या मीटिंगमध्ये सर्व जागतिक आघाडीच्या बल्ब निर्मात्यांनी एक गुप्त करार केला. आपल्या दीर्घकालीन हितासाठी आणि येणार्‍या काळात भरघोस नफा मिळवण्यासाठी ते सर्वजण मिळून निकृष्ट दर्जाच्या अल्पायुषी बल्बचीच निर्मिती करतील. त्या सर्वांनी या कराराचे इमानेइतबारे पालनही केले. पूर्वी अडीच हजार तास चालणारे बल्ब बाजारातून नामशेष झाले. १९२५ नंतर बाजारात येणारे बल्ब फक्त एक हजार तास चालू लागले. आयुष्य घटले आणि साहजिकच बल्बची मागणी वाढली. खप वाढला.

- Advertisement -

निकृष्ट दर्जाचे बल्ब आधीच्या किमतीत विकून या कंपन्यांनी ग्राहकांना मनसोक्त लुटले होतेच. आता आयुष्यमान कमी झाल्यामुळे विक्रीही दुप्पट-तिप्पट झाली. बल्ब विक्रेत्यांची चांदीच चांदी झाली. उत्पादनाचा दर्जा घसरूनही पैसे कमावता येतात हे नवेच गुपित उद्योग जगताला माहीत झाले. बल्ब कंपन्यांच्या त्या एकत्र येऊन सापळा रचणार्‍या कंपन्यांना फिबस कार्टेल या नावाने ओळखले जाऊ लागले. वस्तूंचा दर्जा घसरवून पैसे कमावण्याच्या त्यांच्या क्लृप्तीला म्हणतात प्लॅन्ड ओबसोलेसेंस. खरंतर हा सापळा आहे. मराठीत याला नियोजित अप्रचलन असे म्हणता येईल. सोप्या शब्दात एखादी वस्तू लवकर कालबाह्य करून ग्राहकाला पुन्हा एक नवी खरेदी करायला भाग पाडणे असे याचे नामकरण करता येईल.

१०-१५ वर्षांपूर्वीचे मोबाईल फोन चांगले पाच-पाच वर्षे चालायचे. हल्ली मात्र कितीही भारीचा घेतला तरी एक स्मार्टफोन दोन-तीन वर्षांपेक्षा जास्त टिकूच शकत नाही. कारण तेच. नियोजित अप्रचलन. जाणूनबुजून फोनची रचनाच अशी केली जाते की तीन-चार वर्षांत फोन निकामी व्हावा. (अर्थात यात आपला मोबाईल वापर किती आहे हेही महत्त्वाचे आहे.) जुने उत्पादन दीर्घकाळ टिकाऊ असेल तर कंपनीने निर्माण केलेले नवे उत्पादन कोण घेईल? लाखो कोटी रुपयांचा बिझनेस हवा असेल तर पूर्वीच्याच ग्राहकांना पुन्हा खरेदी करायला भाग पाडले पाहिजे.

आजची बहुतांश उत्पादने याच धर्तीवर बनवली जातात. पूर्वीचे टीव्ही २०-२० वर्षे चांगले चालायचे. आताच्या एलईडीमध्ये ५-७ वर्षांत पट्ट्या पट्ट्या दिसायला लागतात. १००० वेळा पुन्हा पुन्हा दाढी करता येईल आणि स्वच्छ करून पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा टिकाऊ ब्लेड बनवण्याचे तंत्रज्ञान आज उपलब्ध आहे, पण कोणतीही नामांकित कंपनी तशा प्रकारची ब्लेड बनवण्यात पुढाकार घेत नाही. (आपण फक्त जाहिरातीमधील हिरो एखाद्या ब्लेडने दाढी करून कसा मुलींना आकर्षित करतो हेच बघत आलो आहोत.) कारण मग सोन्याची अंडी देणारा बिझनेस कायमचा बसेल.

आपल्या लहानपणी पेनमधील शाई संपली की नवी रिफील घ्यायची प्रथा होती. आता तो पेन कचर्‍यात फेकून नवा पेन घ्यायची प्रथा रुजली आहे. आजही मी जेव्हा पेनच्या रिफीलचा शोध घेत फिरतो तर बहुतांश पेनच्या रिफीलच मिळत नाहीत. कारण तेच. मग दुप्पट किमतीला विकले जाणारे नवे पेन कोण विकत घेईल?

या नियोजित अप्रचलन नावाच्या विकृत व्यापार फंड्यामुळेच ‘वापरा आणि फेका’ नावाचा भस्मासूर जन्माला आला. सुंदर निसर्गाचे एका विशाल कचराकुंडीत रूपांतर व्हायला लागले. कपडे विटले, फेकून द्या. शूज उसवले, फेकून द्या. लॅपटॉप खराब झाला, दुरुस्तीऐवजी नवाच घ्या. इस्त्री चालेना झाली, नवीन घ्या. मिक्सर बिघडले, नवीन घ्या. वॉशिंग मशिन खराब झाली, नवे मॉडेल घ्या. १५-२० वर्षांखालच्या गाड्यांचे स्पेअर पार्ट्स मिळत नाहीत आणि उपभोक्ता कंटाळून गाडी कवडीमोल भावात विकून नवी गाडी घेण्याच्या तयारीला लागतो. एकदा माऊस की-बोर्ड खराब झाला की फेकून द्यावा लागतो. लाईटच्या माळा, चार्जर, हेडफोन इत्यादी इलेक्ट्रीक उपकरणांना दुरुस्त करणे ही संकल्पनाच आता मोडकळीला आली आहे.

फुटबॉल किंवा क्रिकेटमध्ये आणि आता प्रो कबड्डी आणि वेगवेगळ्या मॅरेथॉनमध्येसुद्धा प्रत्येक वर्षी प्रत्येक संघामध्ये नव्या प्रकारच्या जर्सीची ब्रँड न्यू डिझाईन लाँच केली जाते. संघ तोच, खेळाडू तेच, प्रत्येक मोसमात अवतार मात्र नवा असतो. कारण प्रेक्षकांना शर्ट-पँटचे नवे जोड विकायचे आहेत. चाहत्यांना सामन्याला जाताना मागच्या वेळीचा शर्ट घालताना लाज वाटते. सर्वजण त्यांच्याकडे गरीब आहे, असा दृष्टिक्षेप टाकतील म्हणून तो आपल्या आवडत्या संघासाठी नवी जर्सी आनंदाने खरेदी करतो. भारतात कमी असली तरी विदेशांमध्ये ही क्रेझ मोठ्या प्रमाणात दिसते.

नियोजित अप्रचलनाचा आणखी एक छोटा भाऊ आहे, तो म्हणजे समंजस अप्रचलन (पर्सिव्हड ऑबसोलेसेंस). यामध्ये तुमची कार आता जुनी झाली आहे, पर्यायाने तुम्ही आऊटडेटेड झाले आहात असे तुमच्या मनावर बिंबवण्यात येते. जाणूनबुजून आणि प्रयत्नपूर्वक तुमच्या वापरात असलेल्या जुन्या वस्तूंविषयी तुमच्या मनात उदासीनता आणि न्यूनगंड निर्माण केला जातो. एखादी वस्तू विकत घेतली नाही तर तुमचे व्यक्तिमत्त्व अधुरे अपूर्ण आहे, असे जाहिरातींच्या माध्यमातून सुप्त मनावर पुन्हा पुन्हा ठसवले जाते. साधेभोळे आणि खोट्या प्रतिष्ठेपायी या चतुर लोकांनी रचलेल्या जाळ्यात ते अलगद अडकतात. स्वतःला उच्चशिक्षित मानणारा सुजाण श्रीमंत वर्ग या कंपन्यांच्या तावडीत सापडतो आणि आवश्यकता नसताना मजबुरीने नवी खरेदी करतो. त्यांना वारंवार सांगितल्या गेलेल्या उत्पादनांची ते आज्ञा पाळल्यासारखी निमूटपणे खरेदी करतात.

कधी दिखावा करण्यासाठी, कधी छाप पाडण्याच्या नावाखाली, कधी स्वतःचा अहं पोसण्यासाठी, कधी स्टेटस मेंटेन करण्याच्या नावाखाली अव्याहत खरेदी सुरूच असते. कोणतीही नवी खरेदी करण्याआधी मला या वस्तूची खरंच तीव्र गरज आहे का, याचा समग्र विचार करण्याची त्यांची आकलनशक्तीच त्यांनी हळूहळू गमावलेली असते. लठ्ठ पगार कधीही एकटा येत नाही. येताना तो चंगळवादालाही सोबत घेऊन येतो. नवश्रीमंतांच्या बाबतीत तर हे हमखास घडते. महागड्या ठिकाणी पार्ट्यांना जाणे (हल्ली अनेक लग्नांमध्ये हे दिसायला लागले आहे.) आधी भरपूर वाढून घेणे आणि नंतर जात नाही म्हणून ताटात तसेच अन्न टाकून देणे ही याचीच लक्षणे असतात. आर्थिक सुबत्ता असूनही ज्याने संयम गमावला नाही आणि जो सत्त्व पाळू शकला तोच खरा भाग्यवान.

बिझनेस माईंडच्या चतुर पण मूठभर लोकांनी पर्यावरणाचा बट्ट्याबोळ केला आहे. स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी उभ्या जनतेला आणि त्यासोबत निसर्गाला त्यांनी स्वतःच्या दावणीला बांधले आहे. श्रीमंत लोकांचं बरं आहे, ते फक्त पैसे देऊन किंमत चुकवतात. गरीब लोक आपलं आयुष्य देऊन अप्रचलनात बळी जातात. जल प्रदूषण, भूप्रदूषण आणि हवा प्रदूषणाचे सर्वात गंभीर परिणाम त्या देशातील दारिद्य्ररेषेवर झगडणार्‍या लोकसंख्येच्या घटकावरच होतात. आपण आपले भविष्य फक्त बाजारपेठांच्या हातात देणे धोक्याचे आहे. याचे कारण या बाजारपेठांमधील शक्ती मानवजातीसाठी काय चांगले आहे यापेक्षा त्यांचे आर्थिक हित कशात आहे हेच बघत आहे. हे बदलायचे असेल तर प्रत्येक खरेदी सजगपणे करा. वापरा आणि फेकाच्या गोंडस सापळ्यात अडकू नका. अप्रचलनाचे नवे बळी बनू नका.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -