दिवाळी म्हटलं की, शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी हे समीकरणच आहे. याच निमित्ताने मिळणार्या २० दिवसांच्या सुट्टीचा कसा काय उपयोग करून घ्यायचा याचा विचार प्रत्येक घरात चालू होतो. सततच्या कामातून ब्रेक घेण्यासाठीही अशी सुट्टी गरजेचे असते आणि ती संधी चालून येत आहे या नोव्हेंबरमध्ये. सर्वात महत्त्वाचं म्हणजे ऑक्टोबर हिटनंतर नोव्हेंबरमध्ये बर्यापैकी गरम होणं कमी झालेलं असतं आणि त्यात लागून येणार्या सुट्ट्या तुम्हाला नक्कीच चांगला प्लॅन करण्यासाठी उपयोगी ठरू शकतात.
यावर्षी दिवाळी ४ तारखेला वसुबारसपासून सुरु होत आहे. तर ४ तारीख आहे रविवार. बर्याच ऑफिसमध्ये ७ पासून दिवाळीची सुट्टी आहे. ३ तारखेला शनिवार असल्यामुळे दोन्ही दिवस बर्याच ऑफिसला सुट्टी असते. तर केवळ ५ आणि ६ तारखेला ऑफिसमध्ये सुट्टीचा अर्ज केल्यास, तुम्हाला ३ पासून ११ तारखेपर्यंत सलग ९ दिवस सुट्टी मिळण्याची सुवर्णसंधी आहे. त्यामुळे विविध ठिकाणी जाण्याचा प्लॅन तुम्ही या ९ दिवसांसाठी करू शकता. आता हा प्लॅन एकट्याने करायचा की कुटुंबाबरोबर वा आपल्या मित्र मैत्रिणींबरोबर हे तुम्ही स्वतःच ठरवायचे आहे. आता सर्वात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे या ९ दिवसामध्ये जायचं कुठे. तर कुठे जायचं यासाठी काही ठिकाणंही आम्ही तुम्हाला सांगतो –
तारकर्ली – रत्नागिरी
तुम्हाला महाराष्ट्रातच फिरायचं असेल तर नोव्हेंबरमध्ये कोकणपट्टा उत्तम. नोव्हेंबरमध्ये कोकणात हलकी हलकी थंडी पडायला सुरुवात झालेली असते. शिवाय साधारण दिवाळीच्या काळामध्ये बर्याच गावांमध्ये त्रिपुरी पौर्णिमेच्या आसपासच्या उत्सवांनाही सुरुवात झालेली असते. त्यामुळे गावागावांमध्ये अतिशय लगबग आणि मजा असते. तसंच कणकवली, गणपतीपुळे या पट्ट्यातही तुम्ही तुमची ट्रीप प्लॅन करू शकता.
अंदमान – निकोबार
स्वच्छ पाणी आणि शांतता याचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अंदमान – निकोबार. ९ दिवसाची सुट्टी असल्यास, आपल्या कुटुंबाबरोबर वा आपल्या मित्र-मैत्रिणींबरोबर अंदमानची ट्रीप तुम्ही नक्कीच एन्जॉय करू शकता. इतकंच नाही तर ज्यांना रोजच्या धकाधकीच्या जीवनातून शांतता अनुभवायची आहे त्यांच्यासाठी हे ठिकाण योग्य आहे.
सिक्कीम
भारतातील उत्तर पूर्व भागाकडील अतिशय सुंदर ठिकाण म्हणून सिक्कीमची ओळख आहे. याशिवाय इथली संस्कृती आणि इथल्या निसर्गासाठी हा परिसर प्रसिद्ध आहे. इथल्या डोंगर – दर्यांमध्ये एक वेगळीच मजा आहे. कारण इथे गर्दी आणि प्रदूषण या दोन्ही गोष्टींचा लवलेशही नाही. अतिशय प्रसन्न वातावरण आणि शुद्ध हवेसाठी या ठिकाणाला नक्की भेट देता येईल.
मेघालय
सध्याच्या धकाधकीच्या जीवनात आणि विशेषतः मुंबईत राहणार्या लोकांना हिरवळ, डोंगर – दर्या, धबधबे याचा आनंद लुटण्यासाठी वाट पाहावी लागते. मेघालय ही यासाठी सर्वोत्कृष्ट जागा आहे. मेघालयच्या लोकांनी आजही आपली संस्कृती टिकवून ठेवली असून इथल्या जेवणाचा आस्वादही घेण्यासाठी तुम्ही इथली ट्रीप ठरवू शकता.
भूतान
कुठेही फिरायला जायचं म्हटलं की, नक्की किती खर्च होईल हा प्रश्नदेखील उपस्थित होतो. मात्र भूतान हा असा देश आहे जिथे जास्त खर्चही येत नाही आणि निसर्गाचा आनंदही लुटता येतो. सर्वात महत्त्वाचं म्हणजे भूतानला जाण्यासाठी व्हिसाची गरज नाही. इतकंच नाही तर भूताना हा देश निसर्गाने नटलेला असल्यामुळे इथे जाऊन केवळ तुम्हाला आनंदच मिळू शकतो.