घरफिचर्सआत्मनिर्भर भारतातील स्टार्टअपचे विश्व

आत्मनिर्भर भारतातील स्टार्टअपचे विश्व

Subscribe

दरवर्षी अनेक स्टार्टअप सुरू होतात, परंतु त्याची वाढ होणे आवश्यक आहे. वाढ झाली नाही किंवा वाढीचा वेग दिसत नसेल तर गुंतवणूकदार मिळणार नाहीत. अनुभवी गुंतवणूकदार लगेच ओळखतात की, एखादा स्टार्टअप वाढीचा काळ काय असू शकेल. स्टार्टअपच्या वाढीसाठी पुढील काही गोष्टी महत्वाच्या असतात. भविष्याचे योग्य नियोजन, प्रगतीला आवश्यक असणारी संघटना बांधणी त्यात तज्ज्ञांचा समावेश असणे, ग्राहक संपर्क, ग्राहक प्रतिक्रिया विश्लेषण, नवनिर्माण व सततचे इनोव्हेशन, उत्पादन किंवा सेवेत सतत मूल्यवर्धी, लवचिक धोरणे व त्वरित कृती, नियोजनात व भविष्याचा वेध घेण्यात सर्वात पुढे असणेे, समाज, भागीदार, कर्मचारी संबंध महत्वाचे असतात.

– राम डावरे

स्टार्टअप ही संकल्पना सध्या फारच नावाजली गेली आहे. विशेषत: तरुण उद्योजकांमध्ये ही संकल्पना फार आवडती होत चालली आहे, परंतु स्टार्टबद्दल अनेक गैरसमजसुद्धा आहेत. अनेकांना त्याची व्यवस्थित माहिती नाही. ही माहिती असणे फार गरजेचे आहे, स्टार्टअप म्हणजे काय हेसुद्धा बर्‍याच नवउद्योजकांना माहीत नाही. कुठलाही नवीन बिझनेस सुरू करायचा तर त्याला स्टार्ट म्हणायचं का, हासुद्धा एक महत्वाचा प्रश्न नवीन उद्योजकांसमोर असतो. स्टार्टअपसाठी केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनासुद्धा आहेत.

- Advertisement -

दादासाहेब फाळके यांच्या जीवनावरील ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’ हा चित्रपट प्रत्येक उद्योजकांनी बघावा असे मी सुचवितो. ‘दि लाइफ ऑफ ख्रिस्त’ हा इंग्रजी चित्रपट दादासाहेब फाळके यांनी 1910 च्या ख्रिसमसच्या आदल्या दिवशी बघितला आणि त्या पिक्चरच्या प्रेरणेमधून दादासाहेब फाळके यांनी चित्रपट उद्योगाची मुहूर्तमेढ भारतात रोवली. दादासाहेबांना पेंटिंग, प्रिंटिंग, फोटोग्राफी इत्यादी कला अवगत होत्या. भारतीय पौराणिक चित्रपट बनवण्याच्या ध्यासाने दादासाहेबांना झपाटून टाकलं होतं. त्यांच्या सर्व मित्रांनी त्यांना वेड्यात काढले, पण दादासाहेब आपल्या स्वप्नावर ठाम होते.

दादासाहेबांनी चित्रपट निर्मिती या विषयावरील जे काही साहित्य मिळेल ते सर्व वाचले त्याचा अभ्यास केला एवढेच नव्हे तर त्यांनी त्या काळात 75 रुपयात एक कॅमेरा विकत घेतला आणि त्याचं तंत्र शिकायला त्यांनी सुरुवात केली. त्याकाळी ही रक्कम किती मोठी होती याच उदाहरणच सांगायचं तर तेव्हा सोन्याचा भाव 18 रुपये तोळा होता, त्याकाळचे 75 रुपये म्हणजे खूप मोठी रक्कम होती. प्रकरण इथेच थांबले नाही तर घरातील वस्तू गहाण ठेवून त्यांनी चित्रपट निर्मितीचे प्रशिक्षण घेण्यासाठी परत इंग्लंड गाठलं आणि इंग्लंडमधील एका प्रसिद्ध फिल्म स्टुडिओत त्यांनी दोन महिने प्रशिक्षण घेतले. दोन महिन्यानंतर ते भारतात परत आले, तो भारतीय चित्रपट काढण्याच्या ध्यासानं. येताना ते कॅमेरा, डेव्हलपिंग व प्रिंटिंगची काही दिवस पुरेल इतकी सामुग्री चित्रपटावर अनेक पुस्तकं व मासिकं घेऊन आले.

- Advertisement -

चित्रपट काढण्याची पूर्वतयारी तर त्यांनी केली, पण चित्रपट निर्मिती करता लागणारा पैसा त्यांच्याकडे अजिबात नव्हता. त्यांना कोणी पैसे द्यायला तयार होईना. फाळके चित्रपट काढू शकतील त्यापेक्षाही भारतात चित्रपट निघू शकेल यावर लोकांचा विश्वास नव्हता. भारतीय चित्रपटांची बाजारपेठ त्यावेळी अस्तित्वात नव्हती, कित्येकांनी तर चित्रपट पाहिला पण नव्हता आणि सहाजिकच तो काय असतो याची त्यांना अजिबात कल्पना नव्हती. अशा परिस्थितीत पैसे कोण देणार, चित्रपट काय असतो याची कल्पना गुंतवणूकदारांना, व्यापार्‍यांना देणे अनिवार्य होती. आपल्या कल्पनेचा पूर्णपणे विस्तार करणे दादासाहेबांच्या दृष्टीने आवश्यक होते, किंबहुना त्याशिवाय ती पुढे जाऊ शकत नव्हती. इनोव्हेशन होते नवीन कल्पना होती आणि त्याची ओळख सर्वांना करून देणे आवश्यक होते. यालाच प्रूफ ऑफ कन्सेप्ट म्हणजे आपल्या कल्पनेचा पुरावा म्हणतात. याकरता दादासाहेबांना नमुना (डेमो) चित्रपट काढायचा विचार केला आणि एक सुंदर कल्पना त्यांना सुचली. त्यांनी एका कुंडीत शेंगदाण्याचे बी पेरले व त्याच्या रोपट्याची दिवसागणिक होणारी वाढ त्यांनी आपल्या कॅमेर्‍यात टिपली आणि त्यातून एक छोटा चित्रपट तयार झाला त्याचं नाव त्यांनी ‘अंकुराची वाढ’ असे ठेवले.

दादासाहेब फाळके यांनी दाखवून दिले की, तुम्ही तुमच्या बुद्धीला, विचारांना ताण दिला की, ते विस्तारत जातात. इंग्रजी चित्रपट पाहून भारतीय चित्रपट उद्योगाची कल्पना सुचली. दादासाहेबांनी आपली कल्पना इतरांच्या समोर ठेवण्यासाठी ‘अंकुराची वाढ’ हा छोटा चित्रपट आपल्याकडे उपलब्ध असलेल्या साधनांतून बनवला. यामागील विचार खूप काही सांगून जातो. म्हणजे जर दादासाहेबांनी आपली कल्पना नुसतीच लोकांना सांगितली असती तर लोकांना फारसे काही समजलं नसतं. त्यानंतर राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट अस्तित्वात आला. आणि ते होते चित्रपट उद्योगातील पहिले स्टार्टअप. तेव्हा दादासाहेबांनी नुसतंच, मी भारतीय पौराणिक चित्रपट बनवणार आहे, असं जर सांगितलं असतं तर अनेकांनी त्यांना वेड्यात काढलं असतं. ज्यांना थोडी चित्रपटासंबंधी माहिती होती, त्यांनी पण दादासाहेबांना वेड्यात काढले असते. कारण ते तंत्रज्ञान आपल्या देशात उपलब्ध नव्हते. दादासाहेब जे करत होते ते पूर्णपणे नवीन होते आणि त्याची कल्पना सर्वांना तोंडी सांगून फायद्याची नव्हती तर लोकांच्या समोर ठेवून त्यांना त्याचा अनुभव घडवणं निश्चित गरजेचे होते. याकरता दादासाहेबांनी कुशाग्र बुद्धी आणि ध्यास यातून छोटा चित्रपट काढण्याचा निर्णय घेतला. इंग्रजीत प्रोटोटाइप म्हणजे प्रतिकृती म्हणतो ते हेच. आपल्या प्रत्यक्ष जीवनातसुद्धा अनेक गोष्टी आपण नमुना पाहूनच करतो. आपल्या कानापेक्षा आपल्या डोळ्यांवर आपला जास्त विश्वास असतो. आपल्या उत्पादनाच्या शक्यतो नमुना किंवा प्रतिकृती प्रत्येक उत्पादकाला, उद्योजकाला बनवावी लागते. उत्पादन प्रक्रियेत त्याला प्रोटोटाइप म्हणतात, तर आयटी आणि इंटरनेटच्या परिभाषेत याला बीटा व्हर्जन म्हणतात. याच्या अनेक चाचण्या घेऊन मगच त्याची कार्य उपयुक्तता पाहिली जाते.

स्टार्टअपची कल्पना म्हणजे समस्येवर शोधलेला उपाय :-बहुतेक सर्व कल्पनांचा उगम निरीक्षणातून किंवा अनुभवातून होतो. हे निरीक्षण आपल्या स्वतःच्या दैनंदिन जीवनातल्या घटनांचं, अनुभवाचं किंवा उद्योगातल्या कामाचं असतं. त्या सर्व प्रक्रियेत येणारा अनुभव आपल्याला एखादी कल्पना देऊन जातो. आपल्या दैनंदिन आयुष्यात आपल्याला, आपल्या जवळच्या किंवा मित्रांना, इतरांना काही गैरसोयी समस्या समोर येतात, तशा समस्या आपल्यासारख्या अनेकांना असतात. तुमचे नातेवाईक मित्र तुम्ही स्वतः कुठलीतरी तक्रार करता, तेव्हा त्या तक्रारीत नवीन उद्योगाची गाठ बांधलेली असते. त्यात तुम्ही सविस्तर खोलवर विचार केला तर तुम्ही ती तक्रार दूर करण्याच्या मार्गाला लागू शकतात आणि याच प्रक्रियेतून कुठल्यातरी उद्योग कल्पनेचा व उद्योगाचा जन्म होतो. पी सी मुस्तफा हा एक हमालाचा मुलगा, किराणा दुकानात काम करत होता व तिथं त्याला दिसलं साध्या प्लस्टिकच्या पिशवीत भरलेलं, रबर बँडने तोंड बंद केलेल्या पिशवीतील इडली डोश्याचं पीठ. ह्या पिठाला खूप मागणी होती, परंतु ग्राहक नेहमी त्या पिठाच्या दर्जाबद्दल तक्रार करायचे. याच क्षणी मुस्तफाने आयडी फूड ( इडलीचा आय आणि डोशाचा डी ) चालू करण्याचा निर्णय घेतला आणि तोही फक्त रु. 25000/- च्या भांडवलावर व फक्त 500 चौरस फुटाच्या एका छोट्या जागेत. अर्थातच त्यानं ताज, स्वच्छ, आरोग्यदायी, उत्तम दर्जाचा इडली, डोसा, पीठ व इतर वस्तू पुरविण्याचा काम सुरू केलं. 2020 च्या लॉकडाऊनमध्ये मुस्तफाच्या कंपनीने 10 कोटी पराठे आणि 35 कोटी इडली डोसे विक्री केले. त्याची सध्याची वार्षिक विक्री आहे 295 कोटी रुपये. चेन्नई, बंगलोर, हैदराबाद, मुबई, पुणे, दिल्ली, कलकत्ता अशा भारतातील मोठ्या शहरात व सौदी अरेबिया ओमान, बहारीन, कतार व अमेरिकेतसुद्धा त्याची ही कंपनी पोहोचली आहे. आज ह्या कंपनीचे बाजार मूल्य रू. 2000 कोटी आहे. स्टार्टअप म्हणजे नवनिर्माण, नवा उद्योग सुरू करताना इनोव्हेशन, काहीतरी नवीन पद्धती, प्रचलित उत्पादन किंवा सेवा यापेक्षा काही वेगळं देणं, ग्राहकाची अपूर्ण राहिलेली इच्छा पूर्ण करणे होय.

बिजनेस इन्क्युबेटर : लहान बाळाला जसे इन्क्युबेटरमध्ये ठेवतात तसे स्टार्टअपच्या जन्मासाठीसुद्धा इन्क्युबेटर आहे. हे बर्‍याच उद्योजकांना माहिती नाही. काही कंपन्या, शिक्षण संस्था, इंजिनिअरिंग कॉलेजेस किंवा काही सरकारी संस्था बिझनेस किंवा स्टार्टअप इन्क्युबेटर स्थापन करून चालवतात. हे इन्क्युबेटर नवीन स्टार्टअपना त्यांच्या कल्पनांना व्यवहारी औद्योगिक व्यापारी स्वरूप देण्यास मदत करतात. उद्योग कल्पना, बिझनेस मॉडेल ते प्रत्यक्ष उद्योगात रूपांतर हे सर्व ह्या इन्क्युबेटरच्या प्रांगणात शक्य होतं. स्टार्टअप उद्योगाकरता जागा त्यांना लागणार्‍या काही सुविधा त्या सार्वजनिक स्वरूप दिल्या जातात. बहुतेक सर्व इन्क्युबेटर हे विना-नफा तत्वावर चालवल्या जातात, या इन्क्युबेटरमध्ये उद्योजकाला स्टार्टअपचे व्यवस्थापन व मेंटॉरशिप उपलब्ध होऊ शकते. इन्क्युबेटरमध्ये स्टार्टअपचे एका यशस्वी उद्योगात करण्याचे प्रयत्न व साहाय्य केले जाते. ही एक प्रक्रिया आहे जी इन्क्युबेटरमध्ये घडते. केंद्र शासनाच्या वेबसाईटवर अशा इन्क्युबेटरची माहिती उपलब्ध आहे त्याची निवड नवउद्योजक करू शकतात.

स्टार्टअपसाठी भांडवल उभारणीच्या पायर्‍या

बूट स्ट्रॅपिंग- स्टार्टअप आपल्या बाल्यावस्थेत असल्यामुळे बाहेरचा आपल्याला न ओळखणारा कुठलाच गुंतवणूकदार आपल्या स्टार्टमध्ये गुंतवणूक करणार नाही याचे कारण म्हणजे अजून आपल्या उद्योग कल्पनेला मूर्त स्वरूप आलेलं नाही. स्टार्टअप आपली कल्पना तपासून बघत असतो. प्रोटोटाइप किंवा बीटा व्हर्जन बनवत असतो त्यावेळी अजून समजलेले सुद्धा नसतं, ही कल्पना खरंच उद्योग बनू शकेल का? किंवा त्या उद्योग कल्पनांचे बिजनेसमध्ये रूपांतर होऊ शकेल का? या सर्वांची उत्तरं अजून मिळालेली नसतात, ती मिळवण्याचा प्रयत्न हा स्टार्टअप इन्क्युबेटरमध्ये करत असतो. स्टार्टअपच्या पहिल्या प्रवासाचे पैसे लागतात ते बहुतेक उद्योजकाला स्वतःला गुंतवावे लागतात हे त्याचे स्वतःचे किंवा नातेवाईकांकडून उभे केलेले असू शकतात. स्वतः उभे करायचे आहेत, ह्या सर्व प्रक्रियेला स्टार्ट, आजच्या परिभाषेत इंग्रजीत बूट स्ट्रॅपिंग म्हणतात. थोडक्यात बाहेरची कोणत्याही पैशाची मदत न घेता स्टार्टअपचा प्राथमिक खर्च आपल्या स्वतःच्या पैशातून करणे ही पद्धत अत्यंत परिणामकारक व खर्चावर अंकुश ठेवणारी अशी आहे. त्या परिस्थितीत स्वतःचे पैसे वापरल्यामुळे कर्ज त्यावरील व्याज या सर्व गोष्टींपासून उद्योजक दूर राहतो. सर्व स्टार्ट पुन्हा नव्या उद्योजकांना टॅपिंग हे अनिवार्य असतो, याला काही थोडे अपवाद मात्र असू शकतात. बूट्स टॅपिंगमुळे उद्योजकाला पैशाची किंमत कळते. तर अशी ही भांडवल उभारणीची पहिली पायरी आहे. ज्या कुणाला नवीन स्टार्टअप सुरू करायचे आहे, त्यांनी हे लक्षात घेणे गरजेचे आहे की, सुरुवातीला तुमचे स्वतःचे, पालकांचे, मित्र व नातेवाईक यांच्याकडून पैसे गोळा करायचे आहेत, कारण तेच लोक तुम्हाला ओळखतात.

एंजल इन्व्हर्टर : स्टार्टअप सुरू होतो किंवा तो इन्क्युबेशनमध्ये असतो तेव्हा त्याचा खर्च सुरू होतो. हा खर्च आपण आपल्या स्वतःच्या पैशातून भागवू शकलो नाही व पैशाची जरूर लागली तर स्टार्टअपना बीज भांडवल म्हणजे सीड कॅपिटल उपलब्ध होऊ शकते. आपल्याला बीज भांडवल या शब्दावरून कल्पना येते की हे भांडवल स्टार्टअपचे बीज रुजण्यासाठी असते. बरेच वेळा हे बीज भांडवल स्वतः उद्योजक त्याचे आई-वडील नातेवाईक मित्र किंवा जे या उद्योजकाला चांगले ओळखतात, त्याच्याकडून उद्योजकाला उपलब्ध होते. उद्योग कल्पना किंवा बिझनेस मॉडेल अजून सिद्ध झालेले नाही आणि त्याच्या भविष्यकाळातील वाटचालीचाही अंदाज येत नाही. अशा स्थितीत ही गुंतवणूक केली जाते, त्यामुळे ही गुंतवणूक उद्योजकांच्या जवळच्या त्याला चांगले ओळखणार्‍या व्यक्तीकडूनच होऊ शकते, परंतु या सगळ्यात जवळच्या स्त्रोतातून मिळणारं भांडवल कधीकधी मागणीच्या प्रमाणात कमी पडू शकतं व स्टार्टअप उद्योजक अडचणीत येऊ शकतो, उद्योग नवा अनोळखी प्रस्थापित झालेला नसतो, त्यामुळे कदाचित बँकेसारख्या उद्योग संस्था उद्योजकाला भांडवल देण्यास उत्सुक नसतात. काही संस्था देण्यास तयार होतील, परंतु त्याच्या अटी उद्योजकांना न परवडणार्‍या असू शकतात. अशा परिस्थितीत उद्योजकता वाढवण्याच्या उद्देशाने सरकारने या उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी बनवलेली बीज भांडवल योजना त्यांच्या मदतीला येऊ शकते.

भारत सरकारची स्टार्टअपची सीड फंडिंग स्कीम: भारत सरकारनेसुद्धा स्टार्टअपसाठी निधी उपलब्ध करून दिला आहे. या योजनेखाली स्टार्टअपच्या सहाय्याकरिता इन्क्युबेटरसाठी 5 कोटी रुपयांचा निधी मिळतो त्यातून इन्क्युबेटर हे स्टार्टअपसाठी 20 लाख रुपये निधी देऊ शकतात तसेच 50 लाख रुपये स्टार्टअपसाठी मार्केट डेव्हलपमेंटसाठी सुद्धा उपलब्ध होऊ शकतो. त्यासाठी स्टार्टअपला सरकारच्या वेबसाईटवर जाऊन रेजिस्ट्रेशन करणे गरजेचे आहे.

सार्वजनिक निधी उभारणी (क्राउड फंडिंग):

जगभरात स्टार्टअप जसे वाढत आहेत, तसा वेगवेगळ्या गुंतवणूकदारांचा स्टार्टमधील इंटरेस्टसुद्धा वाढत आहे. स्टार्टअपला बीज भांडवल पुरवण्यासाठी आता अगदी नवा नावीन्यपूर्ण पर्याय पुढे आला आहे. या प्रकरणाला सार्वजनिक निधी उभारणे म्हणजे (क्राउड फंडिंग ) असे म्हणतात. थोडक्यात सामान्य माणसाकडून स्टार्टअपला मिळालेले अर्थसहाय्य. ज्या लोकांना स्टार्टअपला मदत करायची आहे, अशा लोकांना या उत्पादनाची किंवा सेवेचे सादरीकरण केले जाते, त्यातील ज्या लोकांना मदत करावीशी वाटते ते मदत करतात. आजमितीला जगभरात असे 500 पेक्षा जास्त क्राउड फंडिंग चे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहे.

व्हेंचर कॅपिटल :

खासगी वैयक्तिक भागभांडवल जे अतिश्रीमंत वैयक्तिक गुंतवणूकदार, इन्व्हेस्टमेंट बँक, गुंतवणूक उद्देशीय फंड इतर वित्तीय संस्था किंवा सरकारी संस्थेतर्फे गुंतवली जाते त्याला व्हेंचर कॅपिटल असे म्हटले जाते. ही गुंतवणूक अशा नवीन स्टार्टअपमध्ये केली जाते ज्याची उद्योगाची कल्पना, आराखडा याची यशस्वी उद्योगात रूपांतर होण्याची शक्यता असते. या उद्योगाची भविष्यात वाढ समृद्धी अपेक्षित असते. ती गुंतवणूक छोट्या उद्योगात किंवा स्टार्टअपमध्ये केली जाते. ही गुंतवणूक मोठ्या प्रस्थापित उद्योगात किंवा कंपन्यात होत नाही या गुंतवणुकीचा कालावधी साधारणतः तीन ते पाच वर्षे असतो, हे गुंतवणूकदार आपल्या गुंतवणुकीवर अधिक परताव्याच्या उद्देशाने गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीत जास्त जोखीम असते.

आय. पी .ओ :

स्टार्टअपची जोखीम सुरुवातीला जास्त व प्रस्थापित अवस्थेत कमी असते. यामुळे प्रत्येक स्थितीतील गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वेगवेगळ्या असतात. वरील गुंतणुकीनंतर गरज वाटल्यास टाईप अ, ब व क अशा गुंतवणुकीच्या अनेक फेर्‍यासुद्धा होतात व नंतर तो स्टार्टअप आयपीओद्वारे शेअर मार्केटमध्ये लिस्ट होतो.
वरील सर्व गुंतवणूकदारांना स्टार्टअपचे मालक काही भागिदारी देतात व नंतर हे गुंतवणूकदार जसजसे स्टार्टअप मोठे होते, तेव्हा दुसर्‍या गुंतवणूकदारांना विकतात व नफा मिळवतात. आपल्याकडील फ्लिपकार्ट ह्या स्टार्टअपनेसुद्धा आपला 74 टक्के हिस्सा 16 बिलियन अमेरिकन डॉलरमध्ये वॉलमार्टला विकल्याचे उदाहरण आहेच.

गुंतवणूकदारांना गुंतवणूक करण्यासाठी आवाहन करण्याची प्रकिया :
नवीन स्टार्टअप्सना गुंतवणूक करण्यासाठी खालील प्रक्रियेतून जावे लागते.
बिझनेस प्लॅन तयार करणे.
गुंतवणूकदारांना ती प्लॅन लेखी किंवा पीपीतीद्वारे सादर करणे.
शंका निरसन करणे.
स्टार्टअप ची कायदेशीर पडताळणी करणे ( ड्यू डिलिजन्स )
बाजाराचा अंदाज, बिझनेस प्लॅनची तपासणी, उद्योजकाची त्याच्या गुणांची, अनुभवाची, कामाची पडताळणी करणे.
तज्ज्ञांची मते घेणे, गुंतवणुकीच्या अटी ठरविणे, गुंतवणुकीचे वेळापत्रक तयार करणे. त्या संबंधी करारनामा तयार करणे.

प्रत्यक्ष गुंतवणूक व त्यावरील नियंत्रण.

स्टार्टअपची वाढ आवश्यक (स्केलिंग अप) : दरवर्षी अनेक स्टार्टअप सुरू होतात, परंतु त्याची वाढ होणे आवश्यक आहे. वाढ झाली नाही किंवा वाढीचा वेग दिसत नसेल तर गुंतवणूकदार मिळणार नाहीत. अनुभवी गुंतवणूकदार लगेच ओळखतात की, एखादा स्टार्टअप वाढीचा काळ काय असू शकेल. स्टार्टअपच्या वाढीसाठी पुढील काही गोष्टी महत्वाच्या असतात. भविष्याचे योग्य नियोजन, प्रगतीला आवश्यक असणारी संघटना बांधणी त्यात तज्ज्ञांचा समावेश असणे, ग्राहक संपर्क, ग्राहक प्रतिक्रिया विश्लेषण, नवनिर्माण व सततचे इनोव्हेशन, उत्पादन किंवा सेवेत सतत मूल्यवर्धी, लवचिक धोरणे व त्वरित कृती, नियोजनात व भविष्याचा वेध घेण्यात सर्वात पुढे असणेे, समाज, भागीदार, कर्मचारी संबंध महत्वाचे असतात.

भारतात 100 च्या वर स्टार्टअप युनिकोर्न :

ज्या स्टार्टअपचे बाजार मूल्य 100 कोटी अमेरिकन डॉलर आहे. (75000 कोटी ) अशा स्टार्टअपला युनिकोर्न स्टार्टअप असे संबोधले जाते. आजमितीस भारतात असे 100 च्या वर स्टार्टअप आहेत. 2021 च्या माहितीनुसार केंद्र सरकारने मान्यता दिलेले एकूण 41000 स्टार्टअप भारतात आहेत. ह्या सर्व स्टार्टअपने मिळून 175000 रोजगार निर्मिती केले आहेत.

लाईफ स्टाईल उद्योजक किंवा उद्योजिका :

कोरोना लॉकडाऊनच्या काळात आपण पहिले की, अनेक महिला पुरुष हे त्यांच्यामधील सुप्त गुण सोशल मीडियावर टाकत होते. मग ते गायन असेल, पाककृती असेल, पेंटिंग असेल किंवा मिमिक्री असेल. तसेच आपल्या देशात अनेक महिला आपल्या फावल्या वेळात अनेक चांगले उद्योग करत असतात. यात अनेक स्रिया चांगले अन्नपदार्थ बनवतात, काही कलाकुसरीने सुंदर कपडे बनवतात, अनेक महिला हस्तकलेत पारंगत असतात आणि सुंदर सुंदर गोष्टी बनवतात. ह्या सर्व महिला, पुरुष लाईफ स्टाईल उद्योजक बनू शकतात. एखादे स्टार्टअप सुरू करू शकतात. एकसारख्या प्रकारची उत्पादने बनविणार्‍या महिला एकत्र येऊन एक क्लटर सुरू करू शकतात. योग्य ते मार्गदर्शन व संघटन करून असे अनेक स्टार्टअप तयार होऊ शकतात. त्यातून रोजगार निर्मितीसुद्धा होईल. सरकार यासाठी अनेक सबसिडी योजना राबवत आहे.
जाता जाता एक महत्वाचा केलेला सर्व्हसुद्धा सांगणे गरजेचे आहे. दरवर्षी जे स्टार्टअप सुरू होतात त्यातील 75 टक्के हे पहिल्या पाच वर्षात बंद पडतात. ह्या बंद पडण्याचा कारणांचा शोध घेतला तर असे आढळून आले आहे की, त्यातील 38 टक्के कारण हे ग्राहकाच्या गरजांचा अपुरा अभ्यास हे आहे. 24 टक्के कारण हे योग्य मनुष्यबळ व त्यांची टीम नसणे हे आहे. 27 टक्के हे कारण अपुरे भांडवल व योग्य आर्थिक नियोजन नसणे हे आहे. इतर 11 टक्के हे वेगवेगळी कारणे आहेत. यावरून स्टार्टअप सुरू करताना ग्राहकांच्या गरजांचा पुरेसा अभ्यास, योग्य मनुष्यबळ व त्याची योग्य टीम, पुरेसे भांडवल, त्याचे योग्य नियोजन ह्या तीन गोष्टी फार महत्वाच्या आहेत.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -