नाशिक : सिन्नर तालुक्यातील शहा येथील १६ वर्षीय मुलीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार मंगळवारी ( दि. 22) मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास उघडकीस आला. पोलिसांना सुसाईड नोट सापडली असून, त्यात तिने गावातील तीन तरुणांकडून त्रास होत असल्याचे नमूद केले होते. या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी थेट वावी पोलीस ठाण्यात मोर्चा काढत मृत मुलीचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. मात्र, पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन लोखंडे यांनी तात्काळ व कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मृतदेह ताब्यात घेत अंत्यसंस्कार करण्यात आले.
याप्रकरणी मुलीच्या वडिलांच्या तक्रारीवरून वावी पोलीस ठाण्यात आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश असून त्यासोबत वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर या संशयित आरोपींच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आत्महत्या केलेली दहावीत शिकणारी १६ वर्षीय वैष्णवी नवनाथ जाधव सिन्नर तालुक्यातील शहा गावातील श्री भैरवनाथ हायस्कूल येथे दहावीच्या वर्गात शिक्षण घेत होती. दोन दिवसांपूर्वी शाळेच्या परिसरात टवाळखोरी करणाऱ्या तसेच शाळेतील मुलींची छेडछाड करणाऱ्या गावातील तिघां तरूणांसोबत तिचा वाद झाला होता. या तिघांनी घरी येत पिडीतेचे वडील नवनाथ जाधव यांना तिच्याबद्दल चुकीच्या गोष्टी सांगून तिच्या बाबत गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला तसेच त्याठिकाणी शिवीगाळ व धक्काबुक्की देखील केली.
तसेच, वैष्णवी हिला उद्देशून ‘तुला जगण्याचा अधिकार नाही, तू जीव दे नाहीतर आम्ही तुझा जीव घेतो’ अशी धमकी देत तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले. हा सगळा वाद विकोपाला गेल्याने गावातील काही ग्रामस्थांनी हे भांडण सोडवत त्या मुलांना समज देऊन जायला सांगितले होते. मात्र हे तीनही मुले गुंड प्रवृत्तीची असल्यामुळे व शाळेच्या परिसरात मुलींची छेडछाड करणे, त्यांना त्रास देणे असे प्रकार नेहमीच करत असल्यामुळे ते आपल्याला व कुटुंबीयांना पुन्हा त्रास देतील या भीतीने घाबरलेल्या वैष्णवीने सोमवारी रात्री घरातील सर्वजण झोपी गेल्यानंतर छताला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शाळेच्या गणवेशातील लेगीज पॅन्ट फाडून तिने दोरी बनवली व घरातील छताला गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार मंगळवारी मध्यरात्री एक वाजेच्या सुमारास तिचे चुलते जालिंदर हे एमआयडीसीतून कामावरून घरी परतल्यावर लक्षात आला.
वैष्णवी, तिचा लहान भाऊ योगेश व चुलता घराच्या बैठक खोलीत झोपायचे. तर आई वडील बाजूच्या खोलीत झोपायचे. भाऊ योगेश हा पिठाच्या गिरणीत उशीर झाल्याने तेथेच थांबला होता. वैष्णवी खोलीचा दरवाजा उघडत नसल्याने जालिंदरने नवनाथ व वहिनी सुनीता यांना उठवले. या सर्वांनी दरवाजा उघडण्यासाठी वैष्णवीला आवाज दिला. मात्र प्रतिसाद येत नसल्याने जालिंदरने पहारीच्या साह्याने दरवाजा तोडला. यावेळी वैष्णवी ने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी वैभव विलास गोराणे, अंकुश शिवाजी धुळसुंदर या दोघांसह एका अल्पवयीनास ताब्यात घेण्यात आले आहे.