बहुचर्चित एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत अखेर कारवाईला सुरुवात केली आहे. वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात शनिवारी मुंबईच्या माजी महापौर आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेत्या किशोरी पेडणेकरांसह चौघाजणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विट करत ही माहिती शनिवारी रात्री सार्वजनिक केली. (A case has been filed against former Mumbai mayor Kishori Pednekar in the SRA case)
किरीट सोमय्या यांनी त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, बहुचर्चित एसआरए घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी वांद्रे पूर्व येथील निर्मल नगर पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे, असे त्यांनी सांगितले.
मुंबई पोलीस निर्मल नगर वांद्रे पूर्व पोलीस ठाण्यात किशोरी पेडणेकर कुटुंब आणि किश कॉर्पोरेट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड विरुद्ध गोमाता जनता एसआरए वरळी मुंबई येथे फसवणूक केल्याप्रकरणी एफआयआर दाखल केला आहे. @BJP4Maharashtra pic.twitter.com/eD2XZLQoUj
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) January 14, 2023
“शिवसेनेच्या नेत्यांचे गैरव्यवहार आता एकामागोमाग एक समोर येत आहेत. कोरोना क्वारंटाईन सेंटर घोटाळ्यात मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना ईडीने नोटीस बजावली. त्यानंतर आता एसआरए घोटाळ्यात किशोरी पेडणेकरांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे आता त्यांच्या अडचणी वाढणार असून त्यांची लवकरच चौकशीही होईल”, असेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, कोरोना क्वारंटाईन सेंटर घोटाळ्याप्रकरणी मुंबई महापालिकेचे आयुक्त आणि प्रशासक इक्बालसिंह चहल यांना ईडीने चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी शनिवारी या प्रकरणावरून ठाकरे कुटुंबीयांवर निशाणा साधला. सोमय्यांनी शनिवारी ट्विट केले की, मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल हे मातोश्रीचे आयुक्त आहेत की मुंबई महापालिकेचे हे अजूनपर्यंत समजलेले नाही. शिवसेनेचे खासदार संजय राऊत त्यांचे पार्टनर सुजित पाटकर यांनी हजारो कोविड रुग्णांच्या जीवाशी खेळ केला. अस्तित्वात नसलेल्या कंपनीला उद्धव ठाकरे यांनी 5-5 कोविड सेंटर्सचे 100 कोटींचे कंत्राट दिले. मी याबाबत आझाद मैदान पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल केली.
मुंबई पोलिसांनी 24 ऑगस्ट 2022 रोजी गुन्हाही दाखल केला होता, मात्र, त्यानंतर चहल यांनी 140 दिवस कोणतेही पेपर तपास यंत्रणांना दिलेले नाहीत. त्यानंतर मी ईडीकडे तक्रार केली. त्यामुळे आता ईडीने याप्रकरणी समन्स बजावले असून चहल यांना ईडीकडे हजेरी लावावी लागेल. इक्बालसिंह चहल यांच्या सहीने हे कंत्राट देण्यात आले होते. हा घोटाळ बाहेर आल्यानंतर यात अनेक अधिकारी अडकतील. लोकांच्या जीवाशी खेळण्याचे पाप त्यांनी केले आहे. मुंबई महापालिका, ठाकरे कुटुंबीयांचा हिशोब घेऊनच राहणार, असे ते म्हणाले.
हेही वाचा – शिवराज राक्षेने ‘महाराष्ट्र केसरी’ जिंकत दाखवलं की, माघार कायमस्वरुपी नसते – अजित पवार