मुंबई – शिवसेनेचे नेते अनिल परब यांचे रत्नागिरी येथील दापोलीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिले आहेत, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. रत्नागिरीतील रिसॉर्ट पाडण्यासंदर्भातील आदेशावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २४ ऑगस्ट रोजी सही केल्याची माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. त्यामुळे लवकरच हे रिसॉर्ट इतिहासजमा होईल असं किरीट सोमय्या म्हणाले.
हेही वाचा – अनिल परब यांचे रिसॉर्ट पाडण्याचे काम लवकरच, राज्य शासन उद्या देणार आदेश – सोमय्या
महाविकास आघाडीतील नेत्यांची एक एक प्रकरण बाहेर काढून त्यांना तुरुंगात टाकणाऱ्या किरीट सोमय्या यांनी पुढचे लक्ष्य अनिल परबांना ठरवले आहे. त्यानुसार, त्यांनी अनिल परब यांचे दापोलीतील रिसॉर्ट अनधिकृत असल्याचे पुरावे याआधीच दिले होते. तसेच, रिसॉर्टच्या बांधणीसाठी काळ्या पैशांचा वापर करण्यात आल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला होता. तसेच, भारत सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने हा रिसॉर्ट ३१ जानेवारी २०२२ रोजी पुढील ९० दिवसांत तोडण्याचे आदेश दिले होते. मात्र, हा रिसॉर्ट न पाडल्याने याविरोधात किरीट सोमय्या यांनी मार्च २०२२ मध्ये दापोली कोर्टात अनिल परब यांच्याविरोधात फौजदारी गुन्हा दाखल करण्याची याचिका केली होती.
किरीट सोमय्या म्हणाले की, हे प्रकरण आता पर्यावरण मंत्रालयाकडे गेले आहे. त्यानुसार, हे प्रकरण रत्नागिरी जिल्हाधिकाऱ्यांकडे जाणार असून ते त्यांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहेत. शनिवारी मी दापोलीला जाणार असून दिवाळीपर्यंत अनिल परब यांचा रिसॉर्ट इतिहासजमा होणार आहे, असं ते म्हणाले.
हेही वाचा – अनिल परब यांचा फोन तपासा…, ‘आपलं महानगर’च्या बातमीवर केसरकरांचे शिक्कामोर्तब
अनिल परब यांनी 19 जून 2019 रोजी पुण्यात राहणाऱ्या विवान साठे यांच्याकडून दापोलीनजीकच्या मुरूड समुद्र किनारी एक कोटी रुपयांमध्ये जागा विकत घेतली. खरेदीखत शेतजमीन म्हणून झाले. पण नंतर 26 जून 2019ला ग्रामपंचायतीला पत्राला लिहिलेल्या पत्रासोबत जागा अकृषिक असल्याचा दाखला देखील जोडण्यात आला, असा दावा सोमय्यांनी यापूर्वीच केला आहे. नंतर लॉकडाऊनच्या काळात म्हणजेच 2020मध्ये अनिल परब यांनी आलिशान साई रिसॉर्ट बांधले. त्यानंतर फेब्रुवारी 2021मध्ये हे रिसॉर्ट परब यांचे भागीदार आणि शिवसेना नेते सदानंद कदम यांच्या नावावर केले, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे.