महाराष्ट्रातून फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला गेल्याने राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. यानंतर आता आणखी एक महत्त्वाचा प्रकल्प गुजरात गेला आहे, ज्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली आहे. 22 हजार कोटी रुपयांचा हा सी-295 लष्करी ट्रान्सपोर्ट एअरक्राप्ट प्रकल्प आता बडोद्याला होणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या प्रकल्पाच्या कोनशिलेचं उद्धाटन होणार आहे. यावरून आता शिंदे फडणवीस सरकारवर पुन्हा एका विरोधकांनी टीकास्त्र डागले आहे. यात विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी देखील राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. हे ईडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे असा खोचक टोला दानवेंनी लगावला आहे.
याबाबत ट्विट करत दानवे म्हणाले की, हे ईडी सरकार महाराष्ट्राचे आहे की गुजरातचे?… फॉक्सकॉन मविआमुळे गेले अशी ओरड केलीत, आता टाटा-एअरबस कोणामुळे गेला? या सरकारने ‘जय महाराष्ट्र’ म्हणणे बंद करावे! मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद केला पाहिजे. केंद्राच्या हुकूमशाहचा आवडता सुभा असलेल्या गुजरात राज्याची विधानसभा निवडणूक भाजपच्या पारड्यात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जोरात काम करत आहे. प्रकल्प घालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे सरकार महाराष्ट्राचे कैवारी की द्रोही? आता जनतेनेच सांगावे! असही दानवे म्हणाले.
केंद्राच्या हुकूमशाहचा आवडता सुभा असलेल्या गुजरात राज्याची विधानसभा निवडणूक भाजपच्या पारड्यात आणण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार जोरात काम करत आहे. प्रकल्प घालवण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे हे सरकार महाराष्ट्राचे कैवारी की द्रोही? आता जनतेनेच सांगावे! (२/२)
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 27, 2022
दरम्यान एका वृत्तवाहिनीशी बोलताना दानवे म्हणाले की, महाराष्ट्रातून टाटा- एअरबससारखा प्रकल्प जाणे दुर्दैवी आहे. यामुळे शिंदे- फडणवीस सरकारची अकार्यक्षमता पाहायला मिळतेय तसेच दिल्लीसमोर झुकत असल्याचे समोर येत आहे. आत्ताच्या महाराष्ट्रातील सरकारमध्ये कोणतेही ताकद नाही, शक्ती नाही, दिल्ली जसे म्हणेल त्याप्रमाणे यांना वागावे लागतेय. दिल्लीवाल्यांनी हा प्रकल्प गुजरातला पळवून नेला आणि महाराष्ट्र सरकार फक्त घोषणाबाजी करत असल्याचा आरोपही दानवेंनी केला आहे.