शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंवर भाजप नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी पुन्हा निशाणा साधला आहे. ठाकरेंना शाह यांनी ४ प्रश्न विचारले आहेत. तसेच २०१९ च्या विधानसभा निवडणुकांपूर्वी बंद खोलीत काय चर्चा झाली याबाबत खुलासा केला आहे. तिहेरी तलाक हटवला, राम मंदिर निर्माण, मुस्लीम आरक्षण, समान नागरी कायदा याबाबत थेट प्रश्न उद्धव ठाकरेंना अमित शाह यांनी केले आहेत.
भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची नांदेडमध्ये सभा पार पडली. संपूर्ण सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे आणि काँग्रेसच केंद्रस्थानी होते. उद्धव ठाकरेंवर घणाघात करताना चार प्रश्न अमित शाह यांनी विचारले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यासोबत मी भाजप अध्यक्ष असताना विधानसभा निवडणूक २०१९ बद्दल चर्चा करण्यासाठी मातोश्रीवर गेलो होतो. तेव्हा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार असे ठरलं होते. परंतु जेव्हा निवडणुकीचा निकाल आला तेव्हा सत्तेसाठी युती तोडली आणि काँग्रेस, राष्ट्रवादीच्या मांडीवर बसले असा घणाघात उद्धव ठाकरेंवर केला आहे.
हेही वाचा : अशोकरावांची मजल २जी, ३जी आणि सोनियाजींपर्यंतच; फडणवीसांचा चव्हाणांवर हल्लाबोल
उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आलेले प्रश्न
“उद्धव ठाकरे हिंमत असेल तर तुमची भूमिका स्पष्ट करा, आम्ही तिहेरी तलाक कायदा हटवला तुम्ही त्याला सहमत आहात का?”
“राम मंदिर बनत आहे. त्याला तुमचे समर्थन आहे का? तुमची भूमिका स्पष्ट करा? राम जन्मभूमीवर मंदिर बनलं पाहिजे की नाही?”
“भाजपची अनेक राज्यातील सरकारने समान नागरी कायदा आणण्याची मागणी करत आहे. हा कायदा आणला पाहिजे का नाही? तुमची भूमिका काय आहे ?”
“मुस्लीम आरक्षण नसले पाहिजे ही भाजपची भूमिका आहे. तुमची भूमिका काय आहे. मुस्लीम आरक्षण संविधानानुसार नाही आहे. धर्माच्या आधारावर आरक्षण होऊ शकत नही. मुस्लीम आरक्षण असलं पाहिजे का नाही ?”
“तुम्ही ज्यांच्यासोबत आहात त्यांचे सरकार कर्नाटकमध्ये आहे. ते काँग्रेसचे लोकं स्वातंत्र्यवीर सावरकर यांना इतिहासातून काढत आहेत. यावर तुमची भूमिका काय आहे ? याला तुमचे समर्थन आहे का?”
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी असे प्रश्न उद्धव ठाकरे यांना विचारले आहेत. यामुळे या प्रश्नांच्या उत्तरात नक्की कशाप्रकारे उद्धव ठाकरे अमित शाहांवर निशाणा साधतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच शिवसेना फोडण्यामागे माझा हात नसून तुम्हाला कंटाळून शिवसैनिकांनीच उठाव केला असल्याचे अमित शाह म्हणाले.
तुम्ही मविआमध्ये या गोष्टीचे समर्थन करु शकत नाही
केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संभाजीनगर, धाराशिव आणि अहमदनगरच्या नामकरणावरुनही निशाणा साधला आहे. तुम्ही त्यांच्यात राहून औरंगाबादचे नाव बदल्याचे समर्थन करु शकत नाही. उस्मानाबादचे नाव बदलण्याचे समर्थन करु शकत नाही. तसेच अहमदनगरचे नाव बदलले त्याचेसुद्धा समर्थन करु शकत नाही. तुम्ही महाराष्ट्रासमोर तुमची भूमिका स्पष्ट केली पाहिजे असा प्रहार अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर केला आहे.
हेही वाचा : Amit Shah in Nanded : धोकेबाजीचे काम उद्धव ठाकरेंनी केले – अमित शाह