एकनाथ शिंदे यांनी बंडाचे निशान फडकावल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाईव्हद्वारे जनतेशी संवाद साधला. त्यात त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांना भावनिक आवाहन केले. मी राजीनामा द्यायला तयार आहे, मुख्यमंत्रीपद सोडायला तयार आहे. पण आमदारांनी माझ्याशी समोर येऊन बोलावे. समोर मागणी करावी. इतकंच नाही तर शिवसेना पक्षप्रमुखपदही मी सोडेल, पण शिवसैनिकांनी मला येऊन सांगावे, असे मुख्यमंत्री म्हणाले. यावर एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एक ट्विट केले आहे.
या ट्विटमध्ये ‘मुख्यमंत्र्यांचं कौतुक करा. आमचे शिवसेनेशी राजकीय किंवा वैचारिक मतभेद आहेत. पण आज उद्धव ठाकरे यांना ऐकल्यानंतर त्यांच्याबद्दलचा आदर वाढला आहे. तुमच्या विनयशिलतेनं तुमच्या पक्षातील सर्व नाराजांना जोरदार चपराक बसली, असं ट्वीट इम्तियाज जलील यांनी केले आहे.
जलील यांची सकाळी शिवसेनेवर टीका –
ज्या पद्धतीने हे सर्व होत आहे, त्यावरून एकनाथ शिंदे एकटे नाहीत. एवढ्या मोठ्या प्रमाणावर आमदार गुजरातला जातात आणि सरकारला हे लक्षातही येत नाही असे होऊ शकत नाही. सर्व आमदारांना पोलिसांचे संरक्षण होते. त्या पोलिसांचे काम काय आहे? नियमाप्रमाणे पोलिसांना आपले कार्यक्षेत्र सोडताना हेडक्वार्टरला कळवावे लागते, की आमचे आमदार याठिकाणी चालले आहे, जावे की नाही, अशी परवानगी घ्यावी लागते. मात्र, इथे असे काहीच दिसत नाही, असे वक्तव्य करत जलील यांनी शिवसेनेवरच संशय व्यक्त केला होता.