‘फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे’, असे विधान केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि भाजपा नेते भागवत कराड यांनी केले आहे. मागील अनेक दिवसांपासून राज्याचे विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार भाजपात येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. काही दिवसांपूर्वी तर अजित पवार यांनी दिल्लीत जाऊन अमित शाह यांची भेट घेतल्याच्याही चर्चांना उधाण आले होते. विशेष म्हणजे या चर्चांवर अनेक राजकीय नेतेमंडळी आपले मत व्यक्त करत आहेत. अशातच भाजपा नेते भागवत कराड यांनीही आपले मत व्यक्त केले आहे. (Bjp leader Bhagwat Karad talk about Political Unrest In Ajit Pawar Ncp And Congress)
‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीवेळी भागवत कराड यांना अजित पवार भाजपात येणार असल्याच्या चर्चांबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना, “फक्त अजित पवारच नाही, तर संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अस्वस्थता आहे. राष्ट्रवादीप्रमाणे काँग्रेसमध्येही तीच परिस्थिती आहे. त्याचबरोबर शिवसेनेचे १५ आमदार आहेत, त्यांच्यातही अस्वस्थता आहे”, असे भागवत कराड यांनी म्हटले.
“काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या तिन्ही पक्षांच्या आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. या अस्वस्थते मागचे कारण म्हणजे तिकडे एकमेकांचे संगोपण नाही. एक विचार नाही. प्रत्येक आमदाराला वाटते आपली कामं व्हावीत, परंतु त्यांच्या सरकारच्या काळातही ते झाले नाही. त्यामुळे महाविकास आघाडीत अस्वस्थता आहे. दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचे मी अभिनंदन करेन. या नेत्यांनी राज्यात चांगली कामं केली आहेत”, असेही भागवत कराड यांनी म्हटले.
हेही वाचा – श्रीसदस्यांच्या जाण्यानं माझं मन जड झालंय, अमित शाहांनी व्यक्त केल्या संवेदना