अंतरवाली सराटी (जालना) – मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्र सरकारने दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी केली आहे. सरकारने मराठा आरक्षणाचा अध्यादेश काढल्यानंतरही जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात आहे. आजपासून (10 फेब्रुवारी ) सकाळी 10 वाजतापासून मनोज जरांगेंनी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषण सुरु केली आहे. मराठा समाज बांधवांनी आपापल्या आमदारांना आजपासून फोन करावे असे आवाहन त्यांनी केले आहे. माझ्याविरोधात जो बोलेल त्यांना आता त्यांच्या पक्षाचे नाव घेऊन उघड करणार, असा इशाराही मनोज जरांंगेंनी दिला आहे.
राज्य सरकारने मराठा आरक्षणासाठी दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे आणि अधिसूचनेचे कायद्यात रुपांतर करावे अशी मागणी जरांगेनी केली आहे. येत्या 15 तारखेपासून विधिमंडळाचे अधिवेशन सुरु होत आहे. त्याआधी दोन दिवस मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी मनोज जरांगे यांनी केली आहे. माजी न्यायमूर्ती शिंदे समितीने अहवाल दिला आहे, तो देखील सरकारने स्वीकारावा, यासाठी विशेष अधिवेशन बोलावण्याची जरांगेंनी मागणी केली आहे.
आमदारांना फोन करा – मनोज जरांगे
मराठा समाज बांधवांनी आपापल्या मतदारसंघातील आमदारांना आजपासून फोन करावे आणि मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याची मागणी करावी, असे आवाहन जरांगेंनी केले आहे. आमदारांनी मराठा समाजाच्या बाजूने उभे राहावे अशी विनंती त्यांना फोन करुन सर्वांनी करावी, असे जरांगे म्हणाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे आंदोलकांना दिलेली अधिसूचना आता कायद्यात रुपांतरीत झाली पाहिजे, यासाठी सर्वांनी आमदारांना फोन करुन विशेष अधिवेशनाची मागणी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
माझ्याविरोधात सुपारी घेतलेल्यांना उघड करणार – मनोज जरांगे
अंतरवाली सराटी ते मुंबई पर्यंत काढलेल्या मोर्चानंतर नवी मुंबई वाशी येथे स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोर्चेकऱ्यांची भेट घेत सगेसोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याची अधिसूचना काढल्याचे पत्र मनोज जरांगेंना दिले होते. त्यानंतर त्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र समाज माध्यमातून मनोज जरांगे यांच्यावर टीका होऊ लागली. सरकारने जरांगेंची फसवणूक केल्याचा आरोप होऊ लागला. यामुळे संतापलेल्या जरांगेंनी माझ्या विरोधात काही लोकांनी सुपारी घेतली आहे. ते यापुढे शांत बसले नाही तर त्यांचा पक्ष आणि नेत्यांची नावं उघड करणार असा इशारा त्यांनी दिला आहे. त्यासोबतच आजपासून अंतरवाली सराटीत आमरण उपोषण सुरु केले आहे.
अन्न-पाणी-उपचारही घेणार नाही
उपोषणाला सुरुवात करताना मनोज जरांगे यांनी सरकारकडे सात महत्त्वाच्या मागण्या केल्या आहेत. आजपासून उपोषण सुरु करताना त्यांनी सात मागण्या केल्या आहेत.
1) सगेसोयऱ्यांचा कायदा करावा. राजपत्र काढवे
2) मराठा समाजातील ज्यांच्या नोंदी नाही त्यांनाही सगेसोयऱ्यांच्या कायद्यानुसार कुणबी प्रमाणपत्र देऊन ओबीसी आरक्षण द्यावे. गृहचौकशी सारखी चौकशी करु नये.
3) दोन दिवसांत विशेष अधिवेशन बोलवा
4) अध्यादेशाचा लाभ मराठा समाजाला होत नाही तोपर्यंत आमरण उपोषण
5) अंतरवाली सराटीसह राज्यात दाखल गुन्हे मागे घेतले जावे.
6) हैदराबाद गॅजेट, बॉम्बे गॅजेट आणि सातारा गॅजेट यांची नोंद घेऊन ते स्वीकारावे आणि ओबीसी प्रमाणपत्र द्यावे.
7) मागासवर्ग आयोगाचा अहवाल स्वीकारुन त्याचा कायदा करावा.
हेही वाचा : Patole vs Fadnavis : ‘लाचार, निष्क्रीय, लालची’; पटोलेंवरील टीकेनंतर काँग्रेसचा फडणवीसांवर पलटवार