मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी हिंदुत्वाच्या मुद्दा केंद्रस्थानी ठेवत सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर चांगलाच हल्लाबोल केला. तसंच, मशिदींवरील भोंग्याबाबतही राज ठाकरे यांनी सरकारला ३ तारखेचा अल्टिमेटम देत भोंगे उतरवण्याचा इशारा दिला. राज ठाकरेंच्या या मशिदींवरील भोंग्याबाबतच्या अल्टिमेटमनंतर राज्यात ठिकठिकाणी धार्मिक वादाला सुरूवात झाली आहे. अशातच आता मशिदीवरील भोंग्यांच्या मुद्यावरून आक्रमक झालेल्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्र सरकार सुरक्षा देण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी भोंग्याच्या मुद्यावरून आक्रमक भूमिका घेतल्यानंतर पीएफआय संघटनेने धमकी दिली होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणजेच पीएफआय या संघटनेने आक्रमक भूमिका घेतली आहे. छेड़ोगे तो छोडेंगे नही असं म्हणत लाऊडस्पीकरला हात लावल्यास आम्ही शांत बसणार नाही असा इशारा त्यांनी मनसेला दिला होता. त्यामुळं केंद्र सरकारकडून राज ठाकरे यांना सुरक्षा पुरवण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज ठाकरे यांनी हिंदुत्ववादी भूमिका घेण्यास मागील काही महिन्यांपासून सुरुवात केली आहे. त्यानंतर आता त्यांनी मशिदीवरील भोंग्याच्या मुद्याला हात घातला आहे. माझा मुद्दा हा धार्मिक नसून सामाजिक असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. तर, दुसऱ्या बाजूला 3 मे नंतर हिंदूनी तयार राहण्याचेही आवाहन केलं होतं. राज ठाकरे यांच्या आक्रमक भूमिकेनंतर केंद्र सरकारकडून त्यांना सुरक्षा पुरवली जाऊ शकते अशी माहिती मिळते.
राज ठाकरे यांनी पाडव्याच्या सभेत आयोध्येला जाणार असल्याची घोषणा केली होती. तसंच, त्यावेळी लवकरच तारीख सांगीन असंही म्हटलं होतं. अखेर राज ठाकरे यांनी काल पुण्यात पत्रकार परिषद घेत, आयोध्येला येत्या 5 जून रोजी जाणार असल्याची घोषणा केली. त्यामुळं राज ठाकरेंच्या आयोध्या दौऱ्यालाही केंद्र सरकारने सुरक्षा व्यवस्था पुरवल्यास त्याची चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच, सध्या राज यांना मुंबई पोलिसांकडून सुरक्षा पुरवली जाते.
हेही वाचा – राज ठाकरेंकडून उद्या महत्त्वाच्या बैठकीचं आयोजन, भोंग्याबाबत राज्य सरकारच्या धोरणावर चर्चा होण्याची शक्यता?