अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. प्रक्षोभक वक्तव्य प्रकरणी सरकारी पक्षाच्यावतीनं राणा दाम्पत्यांच्या ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी केली गेली होती. मात्र, राणा दाम्पत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी विरोध केला होता. राणा दाम्पत्याकडून जामीनासाठी अर्ज करण्याची शक्यता कमी असल्याचं म्हटलं जात आहे, अशातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी ट्विट करत ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
हिंदू धर्मियांची पवित्र हनुमान चालीसा म्हणणे शिवसेनेच्या राज्यात राजद्रोह ठरले आहे, उद्धव ठाकरेंनी शिवसेनेचे हिंदुत्व मिठी नदीत बुडवून टाकले, अशा शब्दांत चंद्रकांत पाटलांनी टीका केली आहे.
उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”, असं ट्विट चंद्रकांत पाटलांनी केलंय.
उत्तम ! हिंदू धर्मियांचा पवित्र “हनुमान चालिसा” म्हणणे हा शिवसेनेच्या राज्यात राजद्रोहाचा गुन्हा ठरला आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या चिरंजीवांनी साहेबांचं हिंदुत्व मिठी नदीत “बुडवून दाखवलं”!
— Chandrakant Patil (@ChDadaPatil) April 24, 2022
राणा दांपत्यावर कलम १५३ (अ) आणि कलम १३५ मुंबई पोलीस कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वांद्रे महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्यांच्या जमीन अर्जावर २९ एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.
हेही वाचा : हनुमान चालिसेला महाराष्ट्रात विरोध नाही, कारागृहात बसूनही वाचू शकता; संजय राऊतांचा राणांना टोला