मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सक्तीची विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. त्यामुळे त्यांनी सर्व प्रशासकीय बैठका रद्द करून आराम करायचे ठरवले आहे. तर, दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही सर्व बैठका रद्द करून दिल्लीला रवाना झाले आहेत. (CM Eknath Shinde not Feeling well)
२० जून रोजी बंड पुकारल्यानंतर एकनाथ शिंदे प्रचंड व्यस्त झाले होते. सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग मुंबई असे दौरे करून त्यांनी भाजपसोबत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापनेनंतरही त्यांचे अनेकवेळा दिल्ली दौरे झाले. दरम्यान, राज्यातील काही भागात अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्यामुळे नुकसानीची पाहणी करण्याकरता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्र दौऱ्यावरही होते. या काळात महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात दौरे करून आढावा बैठक घेत विविध निर्णय घेतले. त्यातच, अद्यापही मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यावरच संपूर्ण राज्याची मदार आहे. या सर्व घटनांमुळे एकनाथ शिंदे यांच्यावर ताण आला होता. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना सक्तीची विश्रांती घेण्याची सूचना दिली आहे. त्यामुळे त्यांनी आजच्या सर्व प्रशासकीय बैठका रद्द करून एक दिवस आराम करण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा – महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाचा पेच कायम, सर्वोच्च न्यायालयातील पुढील सुनावणी ८ ऑगस्टला
दरम्यान, दुसरीकडे महाराष्ट्रातील सर्व कार्यक्रम आणि बैठका रद्द करून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी रवाना झाले आहेत. महिना उलटून गेला तरी राज्यात मंत्रिमंडळ विस्तार न झाल्याने त्यांच्यावर सर्वत्र टीका होत आहे. देवेंद्र फडणवीस दिल्लीत जाऊन गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.
तसेच, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारचा शपथविधी उद्या होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. या मंत्रिमंडळात भाजपाचे आठ तर शिंदे गटाचे सात आमदार शपथ घेण्याची शक्यता आहे. आता या १५ जणांमध्ये कोणाला संधी मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा – पत्राचाळ प्रकरण : संजय राऊत यांना 8 ऑगस्टपर्यंत ईडी कोठडी