घरताज्या घडामोडीजी-२० परिषदेत मुंबईसह राज्याचे ब्रँडिंग करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

जी-२० परिषदेत मुंबईसह राज्याचे ब्रँडिंग करणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे प्रतिपादन

Subscribe

येत्या दोन वर्षात मुंबईचा दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून संपूर्णपणे कायापालट करण्यात येणार आहे. तसेच, यावर्षी जी-२० परिषद आयोजनाचा मान आपल्या देशाला मिळाला आहे. त्यानिमित्त मुंबईसह राज्यातील इतर शहरात १४ बैठका आयोजित करण्यात येणार आहेत. यानिमित्त परदेशातून येणाऱ्या मान्यवर प्रतिनिधींसमोर मुंबई आणि आपल्या राज्याचे ब्रॅंडिग करण्यात येणार आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.

गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत ५०० प्रकल्पांचे भूमिपूजन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गुरुवारी पार पडले. त्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बोलत होते.
याप्रसंगी, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, शालेय शिक्षणमंत्री तथा मुंबई शहर जिल्हा पालकमंत्री दीपक केसरकर, महिला व बालविकास, पर्यटन मंत्री तथा मुंबई उपनगर जिल्हा पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, आमदार ॲड. आशिष शेलार, मुंबई महापालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इकबाल चहल, अतिरिक्त आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि मान्यवर उपस्थित होते.

- Advertisement -

मुंबईचा दर्जेदार आणि विकासात्मक कामाच्या माध्यमातून करणार कायापालट 

मुंबई शहरात पायाभूत सुविधा उत्तम दर्जाच्या देण्यासाठी आपण काम सुरु केले आहे. शहरातील रस्त्यांची दुरुस्ती आणि पुनर्पृष्ठीकरण करुन तर महत्वाचे रस्ते काँक्रिटचे करुन किमान ३० वर्ष ते टिकतील. यावर्षी पाचशे किलोमीटर रस्त्यांचे काम हाती घेतले जाणार आहेत. मुंबईकरांसाठी शहराचा विकासात्मक बदल करण्यास राज्य शासन प्रयत्नशील आहे. रखडलेले प्रकल्प पूर्णत्वास नेऊन आणि या शहराची आंतरराष्ट्रीय पातळीवरील ओळख अधिक ठळक करण्यासाठी आवश्यक बाबी निश्चितपणे करण्यात येतील. प्रत्येक काम दर्जेदार आणि पारदर्शकपणे केले जाईल. येत्या दोन वर्षात खड्डेमुक्त मुंबई करण्याचा संकल्प असून मुंबईकरांच्या हिताला आपले सर्वोच्च प्राधान्य असेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

- Advertisement -

मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाबरोबरच स्वच्छता, पायाभूत सुविधांचे जाळे निर्माण करण्यावर भर देत आहोत. पाच हजार स्वच्छता दूतांच्या माध्यमातून शहर स्वच्छ ठेवण्यासाठीचे नियोजन तयार आहे. मुंबई शहर एकीकडे विस्तारत असताना कोळीवाडे, तेथील संस्कृती, परंपरा जोपासण्याचे काम करण्यात येणार आहे. चार महिन्यात महानगरपालिका क्षेत्रात आपण ५२ बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरु केले, असे सांगून येत्या एक दोन महिन्यात मुंबईत दृश्य स्वरूपात बदल पाहायला मिळतील, असा विश्वास मुख्यमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

मुंबईच्या विकास योजनेचे मुख्यमंत्री शिल्पकार : देवेंद्र फडणवीस

मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्प अतिशय चांगला उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विकासाचा आराखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळे ते या योजनेचे शिल्पकार आहेत, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

मुंबई शहरात सर्व सुविधायुक्त स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच झोपडपट्टी परिसरात स्वच्छतागृहांची अधिकची तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी कम्युनिटी वॉशिंग मशीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी वीज नाही तेथे हँगिंग लाईट ही संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचे महत्व जाणून त्याच पद्धतीने त्याची जपणूक करण्यात येणार आहे. स्काय वॉकच्या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्यात येतील.

आगामी काळात मुंबई या ऐतिहासिक शहरातील वास्तू आणि रस्त्यांचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले. विधानसभा अध्यक्ष ॲड. राहूल नार्वेकर यांनी, आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाची वचनपूर्ती होत आहे. विकासाच्या बाबतीत सर्वांना अपेक्षित असलेला बदल आता पाहायला मिळेल, असा आत्मविश्वास व्यक्त केला. तर, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी, मुंबईला दैदीप्यमान इतिहास आणखी वृद्धिंगत करावयाचा असून मुंबईत स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येतील, असे आश्वासन मुंबईकरांना दिले.

त्याचप्रमाणे, महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी, देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला यापुढे पर्यटन आणि रोजगार संधी निर्माण करणारी राजधानी बनविण्यासाठी राज्य शासनाचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगितले. आमदार आशिष शेलार यांनीही आपले मनोगत यावेळी व्यक्त केले तर आयुक्त डॉ. इकबाल चहल यांनी, मुंबईतील विविध कामांची माहिती दिली.


हेही वाचा : मोदीजी आव्या गुजरात मा ..! गुजरातच्या ऐतिहासिक विजयावर अमृता फडणवीसांची


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -